मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
संजय राऊत (Sanjay Raut) हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान विधिमंडळावर केले आहे. संजय राऊत यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून महाविकास आघाडीतील त्यांच्या सहकाऱ्यांनीही त्यांच्या विधानापासून फारकत घेतली आहे. या सभागृहात बसलेल्यांना चोर म्हंटले आहे. तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली. बोटचेपी भूमिका घेऊ नका. विधिमंडळाच्या अपमानाबाबत अशी भूमिका घेऊ नका, असं आवाहन आशिष शेलार यांनी केलं. शेलार यांच्या या भूमिकेचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी समर्थन केलं. मात्र, कारवाई करण्यापूर्वी नेमकं त्यांनी असं विधान का केले हे तपासून पाहिलं पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
आपण सर्व विधिमंडळाचे सदस्य आहोत. कोणी कोणत्याही पक्षातून निवडून येऊ द्या. कोणत्याही नेत्याला, व्यक्तीला चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. पक्षीय गोष्टी बाजूला ठेवून काही गोष्टी पाळल्या पाहिजे. संविधानाने बोलण्याचा अधिकार दिला. पण काहीही बोलणं योग्य नाही. जे बोलले ते खरोखरच बोलले आहे का? त्यात तथ्य आहे का? जे बोलले त्यांची बाजू घेत नाही. पण शहानिशा केली पाहिजे. कारण नसताना एखाद्या व्यक्तीला टार्गेट करता कामा नये. पण ती व्यक्ती तशी बोलली असेल तर कोणत्याही पक्षाची असो कोणत्याही पदावरील असो त्यांना समज दिली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.