विना सहकार नही उध्दार, जगा सांगे “संजय पवार”…!

0

विना सहकार नही उध्दार, जगा सांगे “संजय पवार”…!

वसंत सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा तात्कालिक विधान परिषदेचे आमदार मुरलीधर आण्णा पवार यांचा समृद्ध वारसा आणि लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या कार्य कर्तुत्वाच्या शिदोरीवर ज्यांचे कर्तृत्व घडले आहे, असे जळगाव जिल्ह्याच्या सहकारातील सर्वमान्य नेते संजय पवार यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना आभाळभर शुभेच्छा…! आजच्या घडीला जळगाव जिल्ह्यातील आघाडीचे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते संजय पवार, हे सहकार क्षेत्रातील एक मात्र निर्विवाद व्यक्तिमत्व आहेत. “विना सहकार, नाही उद्धार !” या तत्वाला अनुसरून त्यांची राजकीय वाटचाल सुरू असून भविष्यात ती अधिकाधिक बहराला जावी यासाठी त्यांना आभाळभर शुभेच्छा.!

संजय पवार यांनी सहकार क्षेत्रामध्ये आपल्या स्वतःचा एक स्वतंत्र, वेगळा ठसा निर्माण केलेला आहे…राजकारणात स्नेहाचे नाते जोपासायचे असते, मैत्रीचे बंध दृढ करायचे असतात. दिलेला शब्द जपायचा असतो आणि जनतेच्या हितासाठी शेतकऱ्याच्या भल्यासाठी आपल्या राजकारणाचा उपयोग करायला हवा, अशी भूमिका घेऊन संजय पवार हे बिनधास्तपणे जिल्हाभर त्यांची हुकूमत गाजवत आहेत. शरद पवार हे आपल्यासाठी दैवत असून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण शेतकरी हितासाठी ज्या ज्या वेळी जी जी भूमिका घ्यावी लागेल ती भूमिका घेऊन ठामपणे उभे राहत आहोत, असा विश्वास ते वेळोवेळी व्यक्त करतात. हीच त्यांची राजकारणातील जमेची पावती आहे.

संजय पवार हे राजकारणात मुरब्बी मानले जात असले तरी, जळगाव जिल्ह्याला त्यांची खरी ओळख एक आदर्श शेतकरी, निष्ठावंत वारकरी, सहकार क्षेत्रातील कुशल अभ्यासक म्हणून आहे. धरणगाव तालुक्यातील चांदसर या त्यांच्या मूळ गावी त्यांनी आपला पवारांचा वाडा आणि पवारांची शेती श्रध्देने जपून ठेवली आहे. त्यांच्या शेतातील विविध आधुनिक पिकांची जोमदार वाढ आणि त्यांनी फुलवलेली बहुउपयोगी फळबाग पहिली की त्यांच्यातील खऱ्या कष्टकरी शेतकऱ्याची ओळख पटते. राजकारणातून निवांत वेळ मिळाला म्हणजे ते आपल्या वडिलोपार्जित शेतीत, गोठ्यातील जनावरं, पशुपक्षी यांच्या देखभालीत रमतात. त्यांच्या शेतातील जनावरांचे सुखसोयींनी सज्ज आधुनिक गोठे बघितले तरी त्यांना जनावरांबद्दल किती प्रेम आहे याची कल्पना येते. शेतात राहणारे, राबणारे संजय पवार आषाढीची चाहूल लागली म्हणजे पांडुरंगाच्या ओढीने सद्गदित होतात. पंढरपुराकडे धाव घेतात. श्रद्धा भक्ती आणि विश्वासाने ते चांदसर येथून पंढरपूर पर्यंत पायी दिंडी काढतात. या दिंडीत परिसरातील शेकडो भाविक सहभागी होतात. त्या सर्वांच्या जेवणाची, राहण्याची, औषधोपचाराची व्यवस्था ते स्वतः जातीने करतात आणि आषाढी एकादशीला थेट पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. अनेक वर्षांपासून त्यांचा हा क्रम चुकलेला नाही. जिल्ह्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर असलेला हा नेता शेतात राबतांना हाडाचा शेतकरी होतो आणि वारीत चालताना भोळा वारकरी होतो. आपण ज्यावेळी जी भूमिका वठवतो त्या भूमिकेशी प्रामाणिक राहायला हवे, हा त्यांचा सिद्धांत आहे जो त्यांना त्यांचे ‘देवरुप’ वडील स्वर्गीय मुरलीधर अण्णा पवार यांच्याकडून वारसा म्हणून मिळालेला आहे.

संजय पवार यांचा सहकार क्षेत्रातील पाया अतिशय मजबूत आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात ज्या ज्या वेळी एखादी निवडणूक लढवावी लागते आणि त्यांना उमेदवारी दाखल करावी लागते, त्या त्या वेळी ते बिनविरोध निवडून येतात. हे त्यांनी राजकारणात जोपासलेल्या स्नेहाच्या बंधाचे यश आहे. राजकारण करत असताना निवडणुकीच्या मैदानात अनेकांवर आरोप – प्रत्यारोप करावे लागतात. परंतु, राजकारणातील जोडे राजकारणातच काढून वैयक्तिक जीवनामध्ये ते सर्वांशी मैत्रीचे संबंध जोपासतात. यामुळे सहकार क्षेत्रात त्यांचा कुणी प्रतिस्पर्धी नाही. त्यांच्या कार्यात कुणीही पक्षीय राजकारण आणत नाही. म्हणूनच, सहकार क्षेत्रातील त्यांचा दबदबा दिवसेंदिवस वाढत आहे. यांचीच परिणिती म्हणून त्यांच्याकडे जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमनपद, जळगांव जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमनपद, महाराष्ट्र कापूस पणन महासंघाचे संचालकपद, जळगांव जिल्हा दूध उत्पादक संघांचे संचालकपद आणि जळगांव जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालकपद आपसूक चालत आले आहेत. या पदांना न्याय देताना ते वेळोवेळी आपली रोखठोक भूमिका बजावतात. ज्या संस्थेत ते पद भूषवतात, त्या संस्थेचे हित हेच त्यांच्या सर्वोच्च स्थानी असते. त्यात ते कोणतीही तडजोड करत नाहीत. वेळप्रसंगी कुणाशी वाईटपणा घ्यायला अथवा वैर निर्माण करायलाही ते डगमगत नाहीत. त्यांची हीच भूमिका त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळी ठरवते.

राजकारणात एखादा विचार अथवा एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्याविरुद्ध ठोस भूमिका घेऊन निडरपणे ते विरोधात उभे राहतात. वेळप्रसंगी प्राणाची बाजी लावतात. मात्र, आपल्या मुद्द्यापासून ते तसुभरही ढळत नाहीत. जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांच्याशी राजकीय मतभेद झाल्यावर त्यांनी त्यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती. त्यासाठी ते स्वतः मैदानातही उतरले होते. ना. पाटील यांच्या पाळधी या गावात जाऊन त्यांच्या विरोधात भाषण ठोकण्याची वेळ जेव्हा त्यांच्यावर आली, तेव्हा त्यांनी कमरेला पिस्तोल लावून जीवावर उदार होऊन आपली भूमिका नेटाने मांडली. असा निडर, बाणेदारपणा जिल्ह्यात फार मोजक्या लोकांनाच दाखवता आलेला आहे. पुढे राजकारणाच्या पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेल्यावर ना. गुलाबराव पाटील आणि त्यांच्यात दिलजमाई झाली. रुसवे फुगवे दूर झाले. एकमेकांच्या भूमिका पटायला लागल्या, तेव्हा ते मागचे सर्व वैर विसरून थेट गुलाबराव पाटलांच्या प्रचारासाठी रणांगणात उतरले. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांनी ना.गुलाबराव पाटील यांचे स्टार प्रचारक म्हणून भूमिका पार पाडली. पवार यांची हीच भुमिका ना. गुलाबराव पाटील यांच्या विजयात महत्त्वाची ठरली. शरद पवार हे आपले दैवत असले तरी अजित पवार यांचा सत्तेतील सहभाग हाच जनतेचा विकास करू शकतो, हे लक्षात घेऊन त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेतली. राजकारणात राहून आपण जनतेचे भले करू शकत नसू, तर आपले राजकारणात राहणे काय कामाचे ? असा सडेतोड प्रश्न ते त्यांच्या भूमिकेवर आक्षेप घेणाऱ्यांना विचारतात. राजकारणात वैर, शत्रुता ही क्षणाची असावी. वैचारिक असावी. वैचारिक मतभेद दूर झाल्यावर शत्रुता ही मैत्रीत बदलता येते, या भूमिकेवर संजय पवार यांची दृढनिष्ठा आहे. म्हणूनच, जिल्ह्यात कोणत्याही पक्षात त्यांचा शत्रू नाही. ते सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी मैत्रीचा बंध जपून आहेत. हा वारसा आपल्याला वडिलांच्या वैचारिक भूमिकेतून मिळालेला असल्याचे ते कृतज्ञ पणे नमूद करतात.

राजकारण म्हटलं म्हणजे पद पैसा आणि प्रतिष्ठा या तीन गोष्टी येतातच. परंतु, संजय पवार यांनी पद, पैसा आणि प्रतिष्ठा या गोष्टींना फारसे महत्त्व दिले नाही. त्यांनी राजकारणात जीवाभावाची माणसं जोपासली आहेत. दिलेला शब्द वेळोवेळी पाळला आहे. म्हणून ग्रामीण भागामध्ये आज तरी त्यांच्या तोडीचा सक्षम राजकारणी दूरपर्यंत दृष्टीस पडत नाही. जिल्हा बँकेचे नेतृत्व म्हणजे एक प्रकारे जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व. जे संजय पवार सक्षमपणे करत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्यांची प्रासंगीक भूमिका, सडेतोड विचारसरणी, लक्षवेधी निर्णय क्षमता आणि सर्व समावेशक व्यक्तिमत्व या चतुसुत्रीचे अधिष्ठान लाभले आहे. म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व समतोल, संयमी आणि सर्वसमावेशक असे बनले आहे. अश्या या बहुआयामी नेत्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. भविष्यात त्यांच्या साऱ्या मनोकामना पूर्ण होवोत हीच शुभेच्छा.!

© भरत चौधरी.
(सहनिवासी संपादक – लोकशाही)
जळगाव.

संपर्क क्रमांक : ७४९८९४९२०१

Leave A Reply

Your email address will not be published.