मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क
साकळी येथील ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांचे गेल्या तब्बल एका वर्षापासून पगार थकले असून पगाराअभावी आपल्या संसाराचा गाडा कसा ओढायचा ?असा गंभीर प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. तरी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांचे थकित पगार अदा करावे अन्यथा कामबंद करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे सर्व कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे.
कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराच्या प्रश्नाने गावातील नागरी समस्या सोडवण्यासाठी सुद्धा मोठी अडचण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या मासिक मीटिंगमध्ये सुद्धा आयत्यावेळी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आलेला होता. त्यावेळी सर्वच कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत आमचे पगार लवकर करा अशी मागणी केली होती. तथापि गावात नागरिकांकडून पुरेशी करवसुली होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार होण्यास विलंब होत आहे असे ग्रामपंचायतीकडून सांगितले जात आहे.
साकळी ता. यावल येथील ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेल्या आस्थापना विभाग व इतर विविध सेवा देणारे कार्यरत कर्मचारी ग्रामपंचायतीने वेळोवेळी सोपवलेले कामे चोखपणे बजावीत असतात. त्याप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांकडून ग्रामपंचायतीने सोपवलेल्या कामांपैकी गटार काढणे, केरकचरा व गटारीची घाण भरणे, जंतुनाशक फवारणी करणे, बीएससी पावडर टाकणे आदी कामे जबाबदारीने केलेली आहे व करत आहे. कोरोना काळात सुद्धा ही सर्व कामे जीव संकटात टाकून केलेली आहे. साकळी गाव मोठे असून सफाई कर्मचाऱ्यांकडून सफाईची कामे नियमित पार पाडली जात असतात. एवढे मोठे सफाईचे काम करीत असतांना सुद्धा ग्रामपंचायतीकडून आमचे वेळेत पगार केले जात नाही. त्यामुळे आमचे गेल्या तब्बल बारा महिन्यांपासून पगार थकीत आहे. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीचे सर्वच कर्मचारी मोठ्या आर्थिक व मानसिक अडचणीच्या सापडलेले आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे कुटुंब असून कुटुंबीयांचे आजारपण, मुलां-बाळांची शिक्षणे, कुटुंबाचे पालन पोषण व इतर संसार प्रपंचायची जबाबदारी आमच्यावर आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या कुटुंब प्रमुख या नात्याने प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. या प्रत्येक बाबींसाठी वेळोवेळी पैसा लागत असतो. मात्र पगार वेळेत मिळत नसल्याने कौटुंबिक गरजा कशा पूर्ण करायच्या ? हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा ठाकलेला आहे.त्यात सणवार व इतर कामे पैशाशिवाय होत नाही त्यामुळे सर्व सण अंधारात जात आहे. एकूणच पगाराअभावी जिवन निराशाजनक व अंधकारमय झालेले आहे.
त्याशिवाय गेल्या आठ वर्षापासून आमचा पीएफ शासकीय नियमानुसार कापला गेलेला असून त्यात ग्रामपंचायतीचा हिस्सा मिळून तो बँकेत भरणा केलेला नाही तरी आमचा पीएफ का भरला नाही ? असे ग्रामविकास अधिकाऱ्यांना विचारले असता ते उडवा-उडवीचे उत्तरे देत आहे. नीट उत्तरे देत नाही. तरी शासकीय नियमानुसार आमचे पीएफ फंड कापला गेलेला असल्याने तो भरणे अनिवार्य आहे. तरी आम्ही सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांना गेल्या बारा महिन्याचे थकीत असलेले पगार तात्काळ देण्यात यावे तसेच गेल्या आठ वर्षापासून कपात केलेला पीएफ खात्यात भरण्यात यावे अशी आमची मागणी आहे. सदर मागणी पूर्ण न झाल्यास दि. १५ सप्टेंबर २०२२ पासून सर्व ग्रामपंचायत कर्मचारी काम बंद आंदोलन सुरु करणार आहे.
या आंदोलन काळात गावातील पाणीपुरवठा साफसफाई व ग्रामपंचायतीसंबंधी इतर कोणतेही कामे होणार नाही. तसेच आंदोलन काळात आमचे व आमच्या कुटुंबाचे काही कमी जास्त झाल्यास त्यास ग्रामपंचायत प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे. सदर आशयाचे निवेदन दि. ८ सप्टेंबर २०२२ रोजी पंचायत समिती (यावल), ग्रामपंचायत (साकळी), तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (जळगाव) यांना देण्यात आलेले आहे. निवेदनावर आस्थापना कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व पाणीपुरवठा कर्मचारी यांच्या सहया आहे. आता कर्मचाऱ्यांच्या निवेदनावर ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणता तोडगा काढला जातो हे पाहणे महत्त्वाचे आहे.