लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती पण आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून विशेषतः कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागांत तुरळक स्वरूपाचा पाऊसही अनुभवायला मिळू शकतो. मात्र, घाटमाथा आणि किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रणालीचा परिणाम राज्यातील हवामानावर होणार असून ३ जुलैनंतर महाराष्ट्रात पावसासाठी अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे.
यंदा जून महिन्यात महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव सर्वच ठिकाणी जाणवला नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस नोंदविण्यात आला. राज्यात जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे ५० टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. देशपातळीवरही परिस्थिती फारशी वेगळी नसून जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा सुमारे ४० टक्के कमी पाऊस झाला आहे. मात्र, अलीकडच्या काळात ढगांची तीव्रता वाढल्यामुळे मान्सूनने पुन्हा गती घेतली आहे. मान्सूनने मध्य प्रदेश, संपूर्ण छत्तीसगड आणि बिहारमधील बहुतांश भाग व्यापला आहे. तरीदेखील देशातील काही भागांमध्ये अद्याप मान्सून पोहोचलेला नाही.
दरम्यान, पुढील काही दिवसांत राज्यातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. विशेषतः किनारपट्टी आणि डोंगराळ भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


