मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;
भगतसिंह कोश्यारी वक्तव्यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे कि, मराठी माणसाला डिवचू नका. तुम्हाला जर महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलू नका. अश्या विधानच पत्र लिहित त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी पत्रात लिहिले कि,
कोश्यारींची होशियारी?
आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो. जय महाराष्ट्र !
असं म्हणत त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. यापूर्वीही महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावर राज ठाकरेंनी भर सभेत कोश्यारी यांची खिल्ली उडवत आपली नाराजी व्यक्त केली होती. यानंतर अनेक माणसे नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपापली मते सोशल मिडियावर मांडली आहे.