लोकशाही न्यूज नेटवर्क

उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने जुलै महिन्यात महाराष्ट्रभर दमदार हजेरी लावत अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस दिला आहे. जुलै हा मॉन्सूनचा सर्वात महत्त्वाचा महिना मानला जातो. यंदा या महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा सुमारे ७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. मात्र, राज्यभर पावसाचे चित्र सारखे नसून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला, तर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये अजूनही सरासरी पावसाची नोंद झालेली नाही.
राज्यात सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला असून येथे सरासरीपेक्षा तब्बल १०४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ पुण्यात ७० टक्के, पालघरमध्ये ५६ टक्के, साताऱ्यात ५५ टक्के, जळगावमध्ये ५४ टक्के आणि मुंबईत ३२ टक्के अधिक पाऊस झाला. ठाणे, रायगड, बुलढाणा, धुळे, गोंदिया, सांगली आणि कोल्हापूरमध्येही सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.
दुसरीकडे, सिंधुदुर्गमध्ये ३७ टक्के, सोलापूरमध्ये ३० टक्के, बीडमध्ये २८ टक्के, नंदुरबारमध्ये २५ टक्के, नागपूर आणि चंद्रपूरमध्ये प्रत्येकी १९ टक्के कमी पाऊस झाला. जालना, अमरावती, गडचिरोली, लातूर, नांदेड, अहमदनगर, रत्नागिरी, वर्धा, भंडारा आणि धाराशिवमध्येही पावसाची तूट कायम आहे. दरम्यान, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


