मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यातच आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता आहे. रविवारपर्यंत राज्यात मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २५ ऑगस्टला दुपारनंतर जोरदार पाऊसासह विजांचा कडकडाट होणार आहे.
हवमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, जळगाव, नंदुरबार, नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर अशा एकूण १६ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये तुरळक पाऊस पडू शकतो.
मुंबईत पावसाला सुरुवात
मुंबईमध्ये देखील आज सकाळपासून मध्यम पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई उपनगर आणि परिसरामध्ये पाऊस पडत आहे. काल रात्रीच्या वेळेस नवी मुंबईला पावसाने झोडपले होते. आज देखील दिवसभरात पावसाची शक्यता आहे. कोकण आणि घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. किनारी भागात जोरदार पाऊस पडू शकतो.
दोन आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. कोकण किनारपट्टीवर पुढील चार दिवस पाऊस राहणार आहे. पूर्व विदर्भात देखील मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघरला यलो ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, परभणीला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.