लोकशाही न्यूज नेटवर्क
आसाम विधानसभा निवडणुकीसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याआधीच झालेल्या कारवाईमुळं राजकीय भूकंप झाला आहे. आसाम पोलिसांच्या एका पथकानं आज, ७ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांच्या मदतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांच्या दिल्लीमधील निजामुद्दीन ईस्ट निवासस्थानी छापेमारी केली. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिंकी भुइयां सरमा यांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडे तीन देशांचे पासपोर्ट आणि विदेशात बेहिशेबी संपत्ती असल्याचा आरोप पवन खेरा यांनी केला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, पवन खेरा यांची चौकशी करण्यासाठी आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यासाठी आसाम पोलिसांचे पथक त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले होते. काही रिपोर्ट्सनुसार, पोलिसांचे पथक खेरा यांना अटक करण्यासाठी गेले होते. मात्र, खेरा त्यावेळी घरी नव्हते. त्यामुळे केवळ झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
हिमंत बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे इजिप्त, संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि एंटिगुआ अँड बारबुडा या तीन वेगवेगळ्या देशांचे पासपोर्ट आहेत. तसेच दुबईत मालमत्ता, अमेरिकेत लाखो-कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असल्याचा आरोप पवन खेरा यांनी केला होता. यासंबंधित कागदपत्रे विश्वसनीय आंतरराष्ट्रीय सूत्रांकडून प्राप्त झाल्याचा दावा खेरा यांनी केला होता. काँग्रेस लवकरच याबाबतचे पुरावे सादर करणार आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. खेरा यांच्या आरोपांमुळं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आसाममधील राजकारण तापलं होतं.
काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या घरावरील छापेमारीबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा सरमा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खेरा हे काल गुवाहाटी येथून पसार झाले आहेत. पोलीस त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहचले होते, अशी माहिती मला मीडियाच्या माध्यमातून मिळाली. पण ते हैदराबादला पळून गेल्याचे समजले. कायदा आपले काम करणार आहे, असेही मुख्यमंत्री सरमा म्हणाले.
गुवाहाटीत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सरमा यांनी हा दावा केला आहे. यावेळी सरमा यांनी काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याविरोधात कठोर पाऊल उचलण्यात येईल, अशी शपथच घेतली. मी पवन खेरा यांच्याविरोधात कठोर कारवाई करणार आहे. थोडे दिवस वाट बघा, असे सांगतानाच, आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत किमान १०० जागा जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

