जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या सहाय्याने उत्तम यश संपादन करता येते. म्हणूनच एकाग्रता आणि स्मरणशक्तीला ‘यशाची गुरुकिल्ली’ असे म्हणतात. एकाग्रता म्हणजे आपल्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे. आपण निश्चित केलेले लक्ष्य किंवा साध्य पूर्ण होण्यासाठी झोकून देऊन, ध्यानी-मनी-स्वप्नी त्याचाच विचार करत राहणे आणि हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. आपण जागेपणी, झोपेत जे ऐकतो, पाहातो, वाचतो, स्पर्श करतो, गंध घेतो या साऱ्या गोष्टी आपला मेंदू साठवून ठेवत असतो. मेंदूने साठवून ठेवलेले हवे तेव्हा, हव्या त्या स्वरूपात आठवणे म्हणजे स्मरणशक्ती. असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ पूनम गेडाम यांनी केले. येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील करियर काउंसलिंग अंड पर्सनैलिटी डेवलपमेंट सेल यांच्यातर्फे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित “तणावमुक्त अभ्यास, सातत्य आणि एकाग्रता” या विषयावरील कार्यशाळेत त्या बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे होते तर यावेळी व्यासपीठावर अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व एमबीए विगभाप्रमुख प्रा. डॉ.कौस्तव मुखर्जी उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ पूनम गेडाम पुढे म्हणाल्या कि, एकाग्रता साधायला न जमण्याची काही प्रमुख कारणं म्हणजे ताण (स्ट्रेस), काळजी, त्या गोष्टीत रस नसणं किंवा प्रेरणा नसणं. त्याचबरोबर आजुबाजूची प्रतिकूल परिस्थिती किंवा अडथळा आणणारे वातावरणातील घटक हेही एकाग्रता साधण्यात अडचणी आणू शकतात. असं अजिबात नाही की तुम्हाला एखाद्या गोष्टीत/कार्यात मन एकाग्र करायला जमत नाही. पण त्यामागे तुमच्या मनात असणारे इतर अनेक विचार हे कारण असू शकतं. त्यामुळे आपल्या मेंदूवर नियंत्रण मिळवायला तुम्हाला जमलं पाहिजे. एकाग्रता सुधारण्याची तीन टप्प्यातली प्रक्रिया- आपल्याला एकाग्रता साधायला जमत नसण्याचं कारण शोधा आणि आपल्याला नेमकं काय लागू होतं, ते ठरवा. या कारणाला नियंत्रित कसं करायचं हे समजून घेणं आणि या विचारांवर (एकाग्रता साधताना भरकटवणाऱ्या विचारांवर) नियंत्रण मिळवण्याची सवय करा. एकाग्रता वाढवण्याच्या टिप्स एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करा. कोणतंही काम मन लावून व काम करताना आरामदायी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीत मन एकाग्र करायचं आहे, ती सोडून आपले विचार दुसरीकडे भरकटू लागल्याचं लक्षात येताच स्वत:च स्वत:ला थांबवा. ध्यानधारणा (मेडिटेशन) करा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यशाळेचे समन्वयक प्रा.डॉ.विशाल सुनील राणा यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.मुकेश अहिरराव, प्रा. डॉ.सरोज पाटील यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.विशाल सुनील राणा यांनी तर प्रा.तन्मय भाले पाटील यांनी आभार मानले. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.
एकाग्रता सुधारण्यासाठी काही टिप्स
एकाग्रता वाढवण्यासाठी कोडी सोडवणं, काही खेळ खेळणं उपयुक्त ठरू शकतं. आपल्या हातातील पेन/पेन्सिल न उचलता वर्तमानपत्रातील एखाद्या लेखातील अमूक एखादं अक्षर किंवा स्वर मनाशी ठरवून त्या सगळ्यांभोवती वर्तुळ करणं. तीन-चार प्रकारच्या डाळी एकत्र करून त्या निवडून वेगवेगळ्या करणं. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता एखाद्या गोष्टीकडे/वस्तूकडे टक लावून पाहत राहणं.