लोकशाही न्यूज
महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी राज्यात तणाव निर्माण केला जातोय. राजकीय दंगलींमुळे भारताचा श्रीलंका होण्यास वेळ लागणार नाही, असे मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
या वेळी राऊत म्हणाले, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे. महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी तणाव निर्माण केला जातोय, असा आरोप करत कोरोनातून सावरत असलेल्या सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
मागील दोन वर्षांहून अधिक काळ हा कोरोनामुळे व्यापार, उद्योग, रोजगाराला मोठा धक्का बसला आहे. आता कोठे सर्वजण यातून सावरत आहेत. मात्र राजकीय स्वार्थासाठी जाणीवपूर्वक तणाव निर्माण केला जात आहे. याला भाजप जबाबदार आहे. केंद्र सरकारला देशातील कोट्यवधी शेतकरी, कष्टकरी जनतेची काळजी नाही. केवळ दंगली घडवून राजकरण करण्याचा भाजपचा उद्योग सुरु आहे, असा आरोपही त्यांनी केला.
तणाव निर्माण झाला ही याचा परिणाम देशातील उद्योगांवर होता. परकीय गुंतवणुकीवर परिणाम होतो. याला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात आम्ही तिन्ही पक्ष एकत्रीत आहे. दंगलीच्या माध्यमातून समाजात व्देष निर्माण केला जात आहे.फोडा व तोडा असे ब्रिटीश धोरण भाजप सरकारकडून वापरले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.