जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यात 22 जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसांत अनेक भागांत सकाळी व दुपारच्या सत्रात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने हा पाऊस महत्त्वाचा मानला जात आहे.
हवामानातील बदलांमुळे जिल्ह्यात मान्सून हळूहळू सक्रिय होत असून 24 जून रोजी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही ठिकाणी ढगांच्या तीव्रतेनुसार दमदार सरीही कोसळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
विशेषतः जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, चोपडा, अमळनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, बोदवड आणि मुक्ताईनगर परिसरात स्थानिक हवामानाच्या स्थितीनुसार पावसाची तीव्रता कमी-अधिक राहू शकते. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याचीही शक्यता आहे.
दरम्यान, 26 जूननंतर मान्सून अधिक बळकट होण्याची चिन्हे दिसत असून जळगाव जिल्ह्यात सर्वत्र चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागांत सलग आणि समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. कापूस, सोयाबीन, मका आणि इतर खरीप पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
सध्या अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून 26 जूननंतर अपेक्षित असलेला व्यापक पाऊस शेतीसाठी दिलासादायक ठरू शकतो. तसेच जलसाठ्यांमध्येही वाढ होण्यास मदत होणार आहे. हवामानातील पुढील घडामोडींवर प्रशासन आणि शेतकरी वर्गाचे लक्ष लागून आहे.


