पंजाब, लोकशाही न्यूज नेटवर्क

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्धवस्थ करण्यात आले. यात 100 अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यामुळे दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्यांना भारताकडे डोळे वटारले तर, विनाशचं होतो हे समजले असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. पाकिस्तानमध्ये अशी कोणतीही जागा नाही जिथे दहशतवादी लपू शकतील, भारत त्यांच्या घरात घुसून त्यांना मारेल आणि त्यांना पळून जाण्याची संधीही देणार नाही असेही मोदींनी यावेळी सांगितले. ते पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी भारतीय सैन्याच्या जवानांना संबोधित करताना बोलत होते.
सैनिकांच्या कुटुंबियांबद्दल कृतज्ञ
भारताचे ड्रोन, क्षेपणास्त्रांचा विचार करून पाकिस्तान अनेक दिवस झोपू शकणार नाही. आमच्या सैन्याने दहशतवाद्यांना चिरडून टाकले असून, भारतीय सैन्य न्यूक्लियर धमकीची हवा काढून टाकतं असे म्हणत पाकिस्तान दहशतवादावर अवलंबून असल्याचे मोदी म्हणाले. तुम्ही सर्वजण देशाच्या वर्तमानासाठी आणि भावी पिढ्यांसाठी एक नवीन प्रेरणा बनला आहात असे म्हणत आज या वीरांच्या भूमीतून, मी हवाई दल, नौदल आणि लष्करातील सर्व शूर सैनिकांना आणि बीएसएफच्या वीरांना सलाम करतो. तुमच्या शौर्यामुळे, ऑपरेशन सिंदूर जगभर गाजत असून प्रत्येक भारतीय तुमच्यासोबत असल्याचा विश्वासही मोदींनी जवानांना दिला. देशातील प्रत्येक नागरिक आपल्या सैनिकांच्या कुटुंबियांबद्दल कृतज्ञ असल्याचेही मोदी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या धोरणाचे, हेतूंचे आणि निर्णायकतेचा संगम असल्याचे मोदी म्हणाले.
वेळेनुसार त्याला प्रत्युत्तर देऊ
मी अभिमानाने सांगू शकतो की तुम्ही तुमच्या ध्येयांवर पूर्णपणे खरे उतरला असून, पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे आणि हवाई तळ उद्ध्वस्त झालेच. याशिवाय त्यांचा वाईट हेतू आणि धाडसही उद्ध्वस्त झाले आहे. शत्रूंनी आदमपूर एअरबेसवर तसेच आपल्या इतर एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाकिस्तानचा वाईट हेतू प्रत्येक वेळी अयशस्वी झाला. देशाच्या मजबूत हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे ड्रोन विमानं आणि त्यांची क्षेपणास्त्रे नष्ट केली. यापुढे जर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला तर भारत त्याला प्रत्युत्तर देईल आणि कठोर प्रत्युत्तर देईल असे सांगत भारताने आता तीन तत्वांवर निर्णय घेतला असून, यात पहिलं तत्व जर, भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर, आम्ही आमच्या पद्धतीने, आमच्या अटींवर आणि आमच्या वेळेनुसार त्याला प्रत्युत्तर देऊ. दुसरे तत्व भारत कोणताही न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही आणि तिसरे तत्त्व आपण दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या सरकार आणि त्यांच्या आकांना एकाच दृष्टीने पाहणार असल्याचेही मोदींनी सांगितले.

