नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
सर्वसामान्यांशी संपर्क साधण्यासाठी विविध माध्यमांचा प्रयोग करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला पहिला पॉडकास्ट रेकॉर्ड केला आहे. यात त्यांनी आपल्या एकूणच राजकीय कारकिर्दीसह खासगी जीवनातील घटनांवरही भाष्य केले आहे. ‘मी देखील एक माणूस आहे, देव नाही. त्यामुळे माझ्याकडून चुका होऊ शकतात…पण वाईट हेतूने मी कधीही, काहीही चुकीचे करणार नाही,’ अशी स्पष्टोक्तीही त्यांनी यात केली आहे.
‘झिरोधा’चे सहसंस्थापक निखिल कामत यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांनी या दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. या दोघांसह भाजप व पक्षाच्या अनेक नेत्यांनी दोन तासांचे हे संभाषण सोशल मीडियावर शेअर केले आहे. या मुलाखतीच्या सुरुवातीला कामत म्हणाले, ‘मी तुमच्या समोर बसून बोलत आहे. मला अनामिक भीती वाटत आहे. हे माझ्यासाठी कठीण संभाषण आहे.’ यावर, ‘हा माझाही पहिला पॉडकास्ट आहे. मला माहीत नाही की तो प्रेक्षकांना कसा वाटेल’, असे उत्तर मोदींनी हसत हसत दिले.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना केलेल्या एका भाषणाचे पंतप्रधान मोदी यांनी या पॉडकास्टमध्ये स्मरण केले आहे. ‘मी म्हणालो होतो की, मी कठोर परिश्रम करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. मी माझ्यासाठी काहीही करणार नाही. मी माणूस आहे, माझ्याकडूनही चुका होऊ शकतात. पण मी वाईट हेतूने कधीच चुकीचे काम करणार नाही. मी हा माझ्या आयुष्याचा मंत्र बनवला’, असे ते म्हणाले. ‘राष्ट्र प्रथम’ या आपल्या मूलभूत विचारसरणीत बसणारे जुने विचार सोडून नवीन विचार स्वीकारण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
‘मी माझ्या कुटुंबातील सर्वांचे कपडे धूत असे. त्यामुळे मला तलावावर जाण्याची परवानगी मिळायची’, अशी आठवण मोदींनी त्यात सांगितली. ‘मी शिक्षक झालो असतो, तर आईला खूप आनंद झाला असता व तिने आजूबाजूला गूळ वाटला असता. मी कधीच विचार केला नव्हता की राजकाणात मी इथपर्यंत पोहोचेन. पंतप्रधान होईन असे मला कधीच वाटले नव्हते. विशिष्ट उंची गाठण्याच्या हेतूने मी कधीच राजकारणात आलेलो नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले. चांगल्या लोकांनी राजकारणात यावे, या आपल्या आवाहनाचा मोदींनी यावेळी पुनरुच्चार केला. या लोकांनी कोणतीही महत्त्वाकांक्षा ठेवून नाही, तर ध्येय घेऊन यावे, असे मोदी म्हणाले. ‘निवडणुकीदरम्यान मला राजकीय भाषणे द्यावी लागतात. ती माझी गरज आहे. मला ते आवडत नाही पण मला ते करावेच लागते’, अशी कबुली त्यांनी दिली.
राष्ट्र प्रथम…
मोदी म्हणाले, ‘कोणतीही गोष्ट कौशल्याने हाताळू शकणारा चमू मी कशाप्रकारे तयार करू शकतो, त्यावर मी माझ्या यशाचे मोजमाप करतो.’ सध्या अनेक तरुण सक्षम राजकारणी आहेत. ते मेहनत करतात, एका ध्येयाने काम करतात. मी एखादे नाव घेतल्यास इतर अनेकांवर अन्याय होईल. माझ्यासमोर अनेक नावे आणि चेहरे आहेत. मला अनेकांची माहिती आहे, परंतु इतरांवर अन्याय न करण्याची जबाबदारी माझी आहे.’ महत्त्वाकांक्षेपेक्षा ध्येयाला प्राधान्य देणाऱ्या आणि ज्यांच्या विचारसरणीचे सार ‘राष्ट्र प्रथम’ आहे अशांचा राजकारणात प्रवेश आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.