लोकशाही न्यूज नेटवर्क
एका व्यक्तीने दोन बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांच्या भावनांशी खेळ केला. त्याने एका बहिणीशी लग्न केलं. तिच्यापासून त्याला दोन मुलं देखील झाली. त्याचवेळी त्याचे दुसऱ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध सुरु झाले. तिला प्रेमाची खोटी आश्वासने देऊन तिच्यासोबत लिव-इन-रिलेशनशिपमध्ये राहू लागला. ज्यावेळी त्या व्यक्तीवरुन दोघा बहिणींनी आपसात वाद घातले त्यावेळी परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, पोलिसांना याची दाखल घ्यावी लागली. अखेर पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आणि आरोपीला तुरुंगात पाठवलं.
ही घटना एखाद्या चित्रपटाचे कथानक नसून चक्क बिहारच्या पटनामध्ये दीघा पोलीस ठाणे क्षेत्रातील घडलेली ही घटना आहे. कुर्जी भागात राहणारा एक व्यक्ती आपल्या मेहुणीसोबत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. रविवारी त्याच्या घराबाहेर महिला संघटनेच्या कार्यकर्त्या आल्या. यात एक महिला त्याची पत्नी होती. पत्नीने त्याच्या घराबाहेर आरडाओरडा सुरु केला. महिलेची बहिण बाहेर येताच दोघींमध्ये वाद सुरु झाला. “तू माझा नवरा पळवलास, माझं घर, संसार मोडलास. तुझ्यामुळे नवऱ्याने मला घराबाहेर काढलं” असं महिला म्हणाली. त्यावर बहिण बोलली, “मी काही केलेलं नाही. तुझ्या नवऱ्याने माझ्यासोबत लग्न केलं. त्याचं माझ्यावर प्रेम आहे”
दोघींमध्ये रस्त्यावरच जोरदार भांडण सुरु झालं. त्यावेळी दोघींना फसवणारा माणूस घराबाहेर आला. महिलेने त्याला विचारलं, सांग तू कोणासोबत लग्न केलयस?. तिघांमध्ये वाद सुरु झाला. महिला संघटनेचे लोक त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. वाद मिटला नाही, अखेर पोलिसांना बोलवावं लागलं.
पहिल्या पत्नीने पोलिसांना सांगितलं की, “साहेब आमची दोन मुलं आहेत. काही वर्षांपूर्वी माझ लग्न झालेलं. त्यानंतर माझ्या बहिणीच लग्न झालं. माझ्या बहिणीचा घटस्फोट झाला. ती एकटी राहू लागली. त्यावेळी तिचे आणि माझ्या नवऱ्याचे प्रेमसंबंध जुळले. मला या बद्दल काही माहित नव्हतं. मला या बद्दल समजल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली” पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी पती विरोधात गुन्हा नोंदवला. आरोपीला बुधवारी कोर्टात हजर करुन तुरुंगात पाठवलं.