नव्या नियमाचा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बसणार फटका ; पीकविम्याचे पैसे मिळू शकणार नाही
छत्रपती संभाजी नगर लोकशाही न्यूज नेटवर्क ;-मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती, जनावरे, घरे यासह सर्वस्व गमावलेल्या शेतकरी कुटुंबांना सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. मात्र आता या संकटात आणखी एका वाईट बातमीने शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे – यंदा पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळणार नाही.

छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, नवीन नियमांनुसार फक्त “कापणीअंती” (post-harvest loss) नुकसान भरपाईसाठी विमा रक्कम मिळू शकते. त्यामुळे अतिवृष्टीसारख्या परिस्थितीत पीकविमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई शक्य नाही. याऐवजी आता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRAF) च्या निकषांनुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाईल.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यांतील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून त्याचे अहवाल शासनाला सादर करण्यात आले आहेत. या आधारे आतापर्यंत ₹६९७ कोटींचा निधी प्राप्त झाला असून उर्वरित ₹७२१ कोटी लवकरच मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्याचे पंचनामे येत्या काही दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही पापळकर यांनी सांगितले.
पूर्वीच्या योजनेत उगम न होणे, स्थानिक आपत्ती, कापणीपूर्व नुकसान, कापणीनंतरचे नुकसान आणि उत्पादन कमी होणे अशा पाच घटकांवर भरपाई मिळत होती. आता फक्त “उत्पादन आधारित नुकसान” या एका घटकावरच भरपाई मिळेल आणि तीही ५०% उत्पादन घटल्यावरच, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पीकविमा योजनेच्या कक्षेत येत नाही.


