मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये आणि नुकसान झाल्यास त्यासाठी नुकसान भरपाई मिळावी म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा संरक्षण योजना काढली, त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पिक विमा प्रीमियम भरून पिक विमा काढले, आणि गेल्या ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान 70 ते 80 टक्के होते, म्हणून शेतकऱ्यांनी रीतसर पिक विमा कंपनीकडे तक्रार अर्ज सादर करून त्या नुकसानीचे पंचनामे करून घेतले, मात्र पिक विमासंरक्षण म्हणून पिक विमा कंपनीने अतिशय तुटपुंज्या प्रकारची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. ही रक्कम इतकी कमी आहे की शेतकऱ्यांनी भरलेला प्रीमियम सुद्धा शेतकऱ्यांना परत मिळाला नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये एक असंतोषाची लहर पसरलेली आहे.
दरम्यान ही चाललेली शेतकऱ्यांची थट्टा रोखण्यासाठी आज शेतकऱ्यांनी एकत्र येत तहसील कार्यालय मलकापूर, कृषी कार्यालय मलकापूर तथा पिक विमा कंपनी कार्यालय मलकापूर या तिन्ही कार्यालयांना भेट देऊन पिक विमा कंपनी विरोधात निवेदन सादर केले. निवेदनात हा तोकडा आलेला पिक विमा आणखी वाढवून मिळावा नाहीतर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे सांगितले आहे. सदरील निवेदनावर विष्णू रायपुरे, सागर रायपुरे, मंगेश राऊत,भागवत रायपुरे, अजाबराव रायपुरे, निळकंठ मोडक, विठ्ठल रायपुरे, नीलकंठ मुळक, निळकंठ रायपुरे,शिवशंकर सदाबल, गणेश रायपुरे,गोपाल रायपुरे महेश कोकाटे, सचिन रायपुरे सह आदींच्या सह्या आहेत.