
लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतात व्यावसायिक सिलिंडरचा भाव काही दिवसांपूर्वी जवळपास १००० रुपयांनी वाढला. त्यानंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचेही संकेत मिळाले आहेत. सरकारी तेल कंपन्यांना दररोज १००० कोटींचा तोटा बसत असल्याचे पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगत इंधन दरवाढीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल १८ रुपये, डिझेल २५ रुपयांनी महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम भारतावर जाणवू लागला आहे. देशात काही दिवसांपूर्वी व्यावसायिक सिलिंडरचा दर वाढला. जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमती वाढल्या. त्याच्या थेट परिणाम भारताच्या बाजारपेठेवर झालाय. काही प्रमाणात पेट्रोल-डिझेलच्या दरातही काही प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याचे आवाहन केलं. यावेळी एका वर्षासाठी विदेश यात्रा, सोने खरेदी करणे टाळण्याचेही मोदींनी आवाहन केलं.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, ‘आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल, नैसर्गिक वायू, LPG चे दर वाढले आहेत. जागतिक पातळीवर कच्चा माल महाग झालाय. परंतु सामान्य जनतेला महागाईच्या झळा सहन कराव्या लागू नयेत, यासाठी देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. सरकारी कंपन्यांना दररोज १००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. चालू तिमाहीत तोटा १००००० कोटींच्या विक्रमी स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते, तेल कंपन्यांना प्रति लिटर पेट्रोलमागे सुमारे १८ रुपये आणि डिझेलमागे २५ रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. या कंपन्यांना तोटा भरून काढायचा असेल, तर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १८ रुपये आणि डिझेलच्या दरात २५ रुपयांनी वाढ करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरकार पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत काय निर्णय घेणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

