जळगाव | प्रतिनिधी वाल्मीक नगर परिसरात शुक्रवारी (२५ एप्रिल) दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विजेच्या धक्क्याने एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. महेश राजेंद्र तायडे (रा. वाल्मीक नगर, पक्की चाळ) असे या तरुणाचे नाव असून, तो घरातील पंखा दुरुस्त करत असताना ही दुर्घटना घडली.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी दुपारी सुमारे ३ वाजता घरातील लाईट गेलेली होती. महेश घरातील इलेक्ट्रिक पंखा दुरुस्त करत होता, तेवढ्यात अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला आणि त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की महेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
शेजाऱ्यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत महेशला खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, मयताच्या आई व आजी यांनी रुग्णालयात हंबरडा फोडला.
दरम्यान, या घटनेची नोंद शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.