पंकज बोरोले यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक तथा रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले यांना पालघर येथे बांबू सेवक पुरस्काराने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, पालघर येथील सेवा विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर ही संस्था पालघर जिल्हयातील बांबूंपासून नवनिर्मिती व्हावी व त्याद्वारे आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्धते बरोबर आर्थिक मदत व्हावी या हेतूने बांबूंपासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण या सेवाभावी संस्थेमार्फत आदिवासी बांधवांना दिले जाते. आदिवासी बांधव आपल्या कला – कौशल्यातून बांबूपासून विविध वस्तूंची निर्मिती करीत असतात.

दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे व जग प्लास्टिककडे वळत आहे अशा प्रतिकूल परिस्थितीत बांबूपासून पर्यावरण पूरक विविध वस्तू तयार करून आदिवासी बांधवांना रोजगार व आर्थिक बळ उपलब्ध करून देण्याचे कार्य सेवा विवेक हि संस्था करीत आहे.

महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पंकज बोरोले यांना बांबू सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक व रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष यांची एकमेव निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सदर उत्पन्नातून आदिवासींची उपजीविका, मुलांचे शिक्षण व आर्थिक उन्नती इत्यादी बाबींसाठी प्रयत्न केले जातात. सदर संस्थेत जिल्हा, राज्य, देश व विदेशातील सेवाभावी व्यक्ती व संस्था सढळ हाताने मदत करीत असतात. सदर सेवाभावी संस्थेस राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेटी दिल्या आहेत. सदर कार्यक्रमास राजेंद्र गावीत (खासदार), रमेश पतंगे (ज्येष्ठ साहित्यिक) यांची विशेष उपस्थिती होती.

पंकज बोरोले यांचे सामाजिक कार्यात नेहमीच योगदान असते. रोटरी क्लब ऑफ चोपडा या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्या बरोबर रामपुरा भागातील स्मशानभूमीत वृक्षारोपण केले. रक्तदान शिबीराचे आयोजन करून ८२ रक्ताच्या बाटल्या संकलित केल्या. आदिवासी भागातील कुपोषित बालकांना व मातांना सक्षम करणे, गरोदर मातांना / महिलांना समुपदेशन करणे व औषधींचा पुरवठा करणे, सिकल सेल अँनिमिया तपासणी व मोफत औषध पुरवठा करणे इत्यादी कार्यक्रम आदिवासी भागातील सत्रासेन या गावी घेण्यात आले. मुलींना स्व- संरक्षणाचे धडे / प्रशिक्षण देणे, कोविड लसीकरण केंद्र उभारणे, शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे इत्यादी उपक्रम राबविले आहेत.

सर्वसामान्य जनतेसमोर शिवरायांच्या आदर्श ठेवण्यासाठी जाणताराजा या महानाट्याचे दोनदा यशस्वी आयोजन केले आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, शेती व सहकार आणि जलसंधारण, आधुनिक तंत्रज्ञान व बांधकाम अशा विविध क्षेत्रातील त्यांची घौडदौड अवर्णनीय आहे. पाणी आडवा – पाणी जिरवा या माध्यमातून त्यांनी पाण्याचे महत्व,पाणी वापराचे योग्य नियोजन, सांडपाण्याचा पुनर्वापर, छतावरील पाण्याचे विहीर पुनर्भरण, गरजू गरीब व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या आदिवासी मजूर बांधवांना दरवर्षी दसरा, दिवाळी निमित्त फराळ, कपडे व संसारोपयोगी वस्तूंचे वाटप केले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.