
लोकशाही संपादकीय लेख
जळगाव शहरापासून जाणाऱ्या महामार्ग जळगाव शहरवासीयांचा कर्दनकाळ ठरतो आहे. जळगाव शहरात वाहतुकीची होणारी कोंडी आणि अपघातामुळे जाणारे अनेकांचे बळी, याला आळा बसावा म्हणून जळगाव शहरापासून जाणारा हा मार्ग पाळधी पासून तरसोद पर्यंत सुमारे 16 किलोमीटर महामार्ग बायपास द्वारे जळगाव शहराबाहेरून काढण्याची मंजुरी मिळाली. धुळे ते अकोला हा संपूर्ण महामार्ग चार पदरी होऊन वर्ष उलटली पण 16 किलोमीटर पाळधी तरसोद बायपासच्या विलंबनाची गिनीज बुकात नोंद होईल. नुकतेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘अनेक मुदत वाढीनंतर २० जुलै 2025 ही अखेरची मुदतवाढ ठेकेदाराला दिली होती. परंतु २० जुलैपासून बायपास सुरू होणे शक्य नाही. कारण गिरणा नदीवरील पुलाचे काही काम बाकी असल्याने दोन महिन्यानंतर बायपासची वाहतूक सुरू होईल. आणखी दोन महिने जळगाव वासियांना या महामार्गावरील वाहतुकीचा त्रास सहन करावा लागणार आहे.’ हतबल होऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सांगत होते. तातडीने युद्ध पातळीवरून कामे निहित वेळेच्या आत करण्याची आमच्या लोकप्रतिनिधींची इच्छाशक्तीच नाही. अपघात होतात. या अपघातांमध्ये अनेक जणांची जीव जातात. किड्या मुंग्यांसारखे नागरिक चिरडले जातात. त्या लोकांच्या जीवाची आमच्या लोकप्रतिनिधींना मुळीच परवा नाही. परंतु ठेकेदारांचे मात्र लांगुल चालन करण्यात त्यांना धन्यता वाटते. या मागचे कारण काय? या प्रश्नांच्या उत्तरातच सर्व काही दडले आहे का? ‘ठेकेदारांवर काही कारवाई करणार का?’ असा प्रश्न विचारला असता हतबल होऊन मंत्री महोदयांनी उत्तर दिले.. ‘आता काय कारवाई करणार? अर्ध्यावर काम झालेल्या बायपास वरून वाहतुकीस परवानगी तर देऊ शकत नाही.’ अशा प्रकारे उत्तर देऊन ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार मंत्री महोदयांनी केला. परंतु 30 मे 2025 ही बायपास सुरू होण्याची अंतिम तारीख देण्यात आली होती. ‘चला पावसाळ्याच्या आधी तरी महामार्गातील शहरातील महामार्गावरची वाहतूक बायपास मार्गे होईल’ म्हणून जळगाव वासीय समाधान व्यक्त करत होते. 30 मे तारीख आली, तेव्हा काही कारण सांगून 20 जुलैपासून बायपास सुरू होईल असे सांगण्यात आले आणि 20 जुलै तारीख येण्याच्या दहा दिवस आधीच पालकमंत्री महोदय म्हणतात, ‘अजून दोन महिन्यांनी बायपास सुरू होईल. आम्ही प्रत्यक्ष जाऊन बायपासची पाहणी केली, तेव्हा गिरणा पुलाचे काही काम बाकी आहे.’ बायपासची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली म्हणजे जनतेवर फार मोठे उपकार केले, अशातला प्रकार नाही. ते तुमचे कामच आहे. परंतु वाढत्या अपघातात किड्या मुंग्यांसारखे लोक चिरडले जातात, त्याचे काय? त्याची जबाबदारी तुमच्यावर नाही का? हा खरा प्रश्न आहे..!
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आमचे लोकप्रतिनिधी आदर्श घेणार आहेत की नाही? पहिल्याच पावसात अग्रवाल हॉस्पिटल चौकातील अंडरपास जवळ महामार्गाला लागून असलेला समांतर रस्ता वाहून गेला. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तो रस्ता वाहून गेला. तेथे मोठी मोठी भगदाडे पडली आहेत. सुदैवाने यात काही जीवित हानी झाली नाही. तथापि या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करणार कोण? जनतेच्या प्रति आमच्या लोकप्रतिनिधींची तसेच अधिकाऱ्यांची संवेदनशीलताच राहिली नाही. निवडणुकीत निवडून येण्यापूर्ती त्यांना जनता आठवते. त्यानंतर पाच वर्षे त्यांना कुणी वालीच राहत नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रांनी जेव्हा खोटे नगर ते कालिंका माता चौपदरीकरणाचे उद्घाटन केले, त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, “हा महामार्ग चुकीचा बनवला गेला आहे. खोटेनगर ते तरसोद पर्यंत हा महामार्ग पूर्णपणे चार पदरी ओवर ब्रिजेचा बनवने भविष्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. अशा पद्धतीच्या चुकीच्या महामार्गाचे मी उद्घाटन करणे योग्य नाही. पण महामार्ग तयारच झाला आहे, म्हणून मी उद्घाटन करतोय.. नव्याने या महामार्गाच्या बीपीआर करून पाठवा, त्याला मी मंजूर देतो…” म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे.. असे असतानाही आपण एकच डोळा घेण्यावर समाधानी असतो हा एक प्रकारे आमच्या लोकप्रतिनिधींच्या संवेदन हिनतेचा प्रकार नव्हे काय? त्यात जळगाव वासियांना आता संपूर्ण पावसाळ्यात महामार्गावरील अपघाताशी सामना करावा लागणार आहे. या पावसाळ्यात आमच्या जळगावकरांचे आणखी किती बळी जातात आणि त्याची जबाबदारी कोण घेणार या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची गरज आहे…?

