लोकशाही न्यूज नेटवर्क
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेस या रेल्वेचे बलुच लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनेने अपहरण करून अनेक प्रवाशांना ओलीस धरले आहे. हा हल्ला बलुचिस्तानमधील बोलानच्या डोंगराळ भागात झाला असून, ओलिसांची सुटका करण्यासाठी सुरक्षा दलांकडून व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेवरून पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केले आहेत.

११ मार्च रोजी क्वेटाहून पेशावरला जाणारी जाफर एक्सप्रेस बोलानच्या डोंगराळ भागातील एका बोगद्यातून जात असताना आठ सशस्त्र दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. त्यानंतर ही ट्रेन हायजॅक केली. या घटनेवर पाकिस्तानने भारताविरुद्ध पुन्हा एकदा आरोपांचे सत्र सुरू केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी ट्रेन हायजॅकमध्ये भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
स्वतंत्र बलूचिस्तान आणि स्वतंत्र पंजाब-सिंध ही मागणी 70 वर्षांपासून सुरू आहे. या दोन्ही भागातील लोकांना स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा हवा आहे. मंगळवारी बलूचिस्तानमधील बंडखोर बलोच लिबरेशन आर्मीने जफर एक्सप्रेस हायजॅक केली. या ट्रेनमध्ये 400 हून अधिक प्रवाशी आणि सैन्य कर्मचारी होती. पाकिस्तानी लष्कराने 155 प्रवाशांची सुटका केली आहे. या कारवाईत लष्काराचे काही जवान आणि 27 बंडखोर मारल्या गेले. ट्रेन हायजॅकमागे भारत आणि अफगाणिस्तानचा हात असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. अर्थात पाकिस्तान किती खोटारडा आहे हे जागतिक मंचावर अनेकदा उघड झाले आहे.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी कोणताही पुरावा न देता या हल्ल्यामागे भारत आणि अफगाणिस्तान असल्याचा कांगावा केला आहे. आपल्या गुप्तहेर खात्याचे अपयश झाकण्यासाठी पाकिस्तान आता खोट्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न करत आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सनाउल्लाह यांनी या हल्ल्यामागे तहरीक-ए-तालिबान ही संघटना असल्याचे म्हटले आहे. ही संघटना बलूच आर्मीला रसद पुरवत असल्याचे सनउल्लाहचे म्हणणे आहे. हे सर्व भारत घडवून आणत आहे, यात कोणतीच शंका नाही. भारत सर्व प्रकारची मदत करत आहे आणि अफगाणिस्तानमध्ये या बंडखोरांना सुरक्षित आश्रय मिळत आहे. तिथे बसूनच अशा हल्ल्याचे प्लॅनिंग करण्यात येते. बलोच बंडखोरांकडे कोणताही राजकीय अजेंडा नाही. त्यांना केवळ लोकांच्या हत्या घडवून आणायच्या आहेत, असे बेताल वक्तव्य सनउल्लाह यांनी केले. पाकिस्तानी लष्कर बलूचमधील महिला, मुलं, तरुणांवर किती अत्याचार करते हे सांगायला या सनउल्लाहची जीभ रेटत नाही. पण हल्ला झाला की भारताकडे बोट दाखवून मोकळं होण्याचा एककलमी कार्यक्रम पाकिस्तानकडून सुरू असल्याचे समोर आले आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान आल्यापासून पाकिस्तानमध्ये अस्थिरता वाढल्याचा आरोप सनउल्लाह यांनी म्हटले आहे. पूर्वी बंडखोरांना रसद, प्रशिक्षण आणि दारूगोळा मिळत नव्हता. पण आता त्यांना या सर्व सुविधा मिळत असल्याचे ते म्हणाले. या बंडखोरीच्या तावडीतून ओलिसांना सोडवण्याचे काम सुरू आहे. पण बंडखोरांनी काही सुसाईड बॉम्बर्स त्यांच्या जवळ बसवल्याने कारवाई करता येत नसल्याची माहिती सनउल्लाह यांनी दिली.


