लोकशाही न्यूज नेटवर्क

भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहेत. बलूचिस्तानच्या सीमेवर ही दुर्घटना घडली. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस वळणाच्या रस्त्यावर उलटून दरीत कोसळली. ही बस क्वेटाहून इस्लामाबादला जाताना हा अपघात घडला. या घटनेने संपूर्ण पाकिस्तानमध्ये शोककळा पसरली आहे.
बलूचिस्तान राज्य सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा देत म्हटलं की, बलूचिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सीमेवर बस दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह ताब्यात घेत रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर 8 जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच 6 रुग्णवाहिका, 12 वैद्यकीय कर्मचारी, 10 वाहने घटनास्थळी पोहोचले.
प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, बस प्रवाशांनी भरलेली होती. बसच्या छतावरही प्रवासी बसले होते. खरंतर बसमध्ये आधी फक्त 36 प्रवासी बसले होते. परंतु खराब रस्त्यावर एका बंद पडलेल्या बसमधील प्रवासी या बसमध्ये येऊन बसले. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये बसल्यामुळे अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघाताची माहिती मिळताच शेरानी जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, बचाव पथक घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलं.
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी आणि बलूचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांप्रती संवदेना व्यक्त केली. तसेच त्यांनी प्रशासनाला जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. शेरानीचे उपायुक्त हजरत वली काकर यांनी म्हटलं की, आता जखमींची प्रकृती स्थिर आहे. प्रवाशांचे मृतदेह हे रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आले आहेत. आता मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच मृतांची नावे देखील अद्याप समोर आलेली नाही. या भीषण अपघाताने पाकिस्तान, बलूचिस्तानमधील नागरिक शोकसागरात बुडाले आहेत. या अपघातानंतर अनेक जण हळहळ व्यक्त करत आहे.


