पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम एकता संघटनेतर्फे तीव्र निषेध
जळगाव, ;- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम खोऱ्यातील एका रिसॉर्टवर अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू, तर २० हून अधिक जण जखमी झाले. या भ्याड हल्ल्याचा मुस्लिम एकता संघटनेने तीव्र शब्दात निषेध करत केंद्र सरकारकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
हा हल्ला दिनांक २२ एप्रिल रोजी दोन ते तीन अतिरेक्यांनी पर्यटकांच्या ४० जणांच्या गटावर केला. या प्रकरणी जबाबदार असलेल्या ‘टीआरएफ’ (The Resistance Front) या दहशतवादी संघटनेचा निषेध करत, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी संघटनेने केली आहे.
या भीषण घटनेबद्दल मुस्लिम एकता संघटनेच्या वतीने मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, जखमींना लवकरात लवकर आरोग्य लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली आहे. तसेच, शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात संघटना सहभागी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर निषेधाचे निवेदन माननीय अप्पर जिल्हाधिकारी अंकुश किनोटे यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपतींना सादर करण्यात आले. या वेळी मुस्लिम एकता संघटनेचे फारुक शेख, सय्यद चांद, भुसावळचे साबीर शेख, शेंदुर्णीचे अशपाक भागवत व रेहान शेख, मझर पठाण, मतीन पटेल, अनिस शहा, अन्वर सिकलगर, आरिफ देशमुख, बाबा देशमुख, युसुफ पठाण, सलीम इनामदार, अमजद पठाण, कासिम उमर, मुजाहिद खान, सईद शेख, इम्रान शेख, नजमुद्दीन शेख आणि आरिफ अजमल यांचा समावेश होता.