मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल मंगळवार रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच या कुटुंबियांच्या शिक्षणाकडे तसेच रोजगाराकडेही राज्य सरकार लक्ष देणार आहे. पुण्यातील संतोष जगदाळे यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला, त्यांच्या मुलीला शासकीय नोकरी देण्यात येणार आहे. जगदाळे कुटुंबातील मुलीला नोकरी देण्यासाठी आपण कालच बोललो होतो. पण आता मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार वापरत त्यांना आता शासकीय नोकरी देणार, असा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला.
डोंबिवतील 3 मावसभावांचा मृत्यू झाला. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी हे कुटुंबियांसोबत एकत्र काश्मीर फिरायला गेले, त्यांना दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबियांसमोरच गोळ्या घातल्या. तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हो दोघे लहानपणापासूनचे मित्र, तेही त्यांच्या कुटुंबासह पहलगाम येथे गेले होते. त्यांनाही दहशतावाद्यांनी डोक्यात गोळी मारून ठार केलं. तर नवी मुंबईतील दिलीप देसले यांचाही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.