बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

बहिणीच्या घरी घेतला गळफास

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

आज दुपारी बारावीचा निकाल लागला. मात्र निकालात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने नैराश्यातुन १९ वर्षीय तरुणाने पाचोरा शहरातील आपल्या बहिणीच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भावेश प्रकाश महाजन (वय १९, रा. एरंडोल ता. एरंडोल)  हा विद्यार्थी एरंडोल येथे महाविद्यालय शिक्षण घेत होता. नुकत्याच झालेल्या १२ वीच्या परिक्षेत भावेश याने एरंडोल येथे परिक्षा दिली होती. प्रतिक्षा दिल्यानंतर भावेश हा गेल्या १५ दिवसांपासून पाचोरा येथील भडगाव रोड वरील राजीव गांधी काॅलनी (शक्तीधाम जवळ) राहत असलेल्या बहिणीकडे आला होता. ४ मे रोजी सायंकाळी भावेश याची बहिण व पाहुणे हे पुणे येथे लग्न समारंभासाठी गेले होते. भावेश हा ५ मे रोजी सकाळी १० वाजता पाचोरा शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील दुसऱ्या पाहुण्यांच्या दुकानावर गेला होता.

दरम्यान दुपारी १२ वाजता भावेश हा दुकान बंद करुन राजीव गांधी काॅलनी येथील बहिणीच्या घरी गेला. दुपारी १ वाजता १२ वी चा आॅनलाईन निकाल जाहिर झाला. यात भावेश यास ४२ टक्के गुण मिळाले. भावेश याने नैराश्यातुन बहिणीच्या राहत्या घरात गळफास लावुन आपली जीवनयात्रा संपवली. दुसरीकडे शहरातच वास्तव्यास असलेल्या दुसऱ्या बहिणीकडुन भावेश यास जेवणाचा डब्बा येत होता. डब्ब्यासाठी बहिण भावेश यास फोन करीत होती. मात्र भावेश फोन उचलत नव्हता. अखेर पाहुण्यांनी शेजारी राहणाऱ्या मित्राला घरी जाऊन चौकशी करण्यास सांगितले असता सदरची घटना समोर आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी व रुग्णवाहिका चालक संजय पाटील हे घटनास्थळी पोहचुन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह रुग्णवाहिका चालक संजय पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.