लोकशाही संपादकीय लेख

दोन धक्कादायक गोष्टी महाराष्ट्रात घडल्या. एक ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने सहा खासदारांनी शिवसेना उबाठा गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि दुसरी म्हणजे नाशिक विधान परिषदेचा निकाल महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव करून अपक्ष गोकुळ गीते यांचा सनसनाटी विजय झाला. ऑपरेशन टायगरमध्ये सहा खासदार उबाठातून शिंदे सेनेत गेले. त्यात नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळचे संजय देशमुख, मुंबईचे संजय दिना पाटील, परभणीचे संजय बंडू जाधव आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर त्यांचा समावेश आहे. हे सहाही खासदार शिंदे प्रवेश केलेले आहेत. त्यासाठी त्यांनी वाय प्लस सिक्युरिटी देण्यात आली आहे. इकडे ऑपरेशन तुडवा हा उबाठा गटाकडून नारा पुकारला गेला. त्यामुळे त्यांचे घरी सुद्धा वाय प्लस सिक्युरिटी देण्यात आली आहे. यामध्ये सर्वात जास्त खासदार ओमराजे निंबाळकर आणि मुंबईचे संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचा फार विश्वासघात केलेला आहे. या दोघांनी शेवटपर्यंत सांगितले की, आम्ही ऑपरेशन टायगरमध्ये जाणार नाही किंवा संसदेचे सभापती ओम बिर्ला यांचेकडे स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी ज्या सह्या द्याव्या लागतात त्यावर आमची सहीच नाही असे सांगितले. आमचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यानंतर लगेच ओमराजे निंबाळकर यांनी मतदारसंघा त संघातील मतदारांशी संपर्क साधून मी माझा निर्णय कळवणार आहे, असे म्हणून ‘भावनिक दृष्ट्या शिंदे सेनेत प्रवेश करणे चुकीचे पण राजकीय दृष्ट्या योग्य’ आहे, असे म्हणून बाजी पलटवली. त्यातच 20 तारखेला त्यांच्या वडिलांच्या हत्येचा निकाल होता तो निकाल आमच्या बाजूने लागावा म्हणून मी हा निर्णय घेत आहे. पण निकाल फिरला. सर्व आरोपी निर्दोष सुटले. त्यानंतर ओमराजेंना बोलायला काही शिल्लक राहिले नाही.
हे सर्व सांगण्यासाठी ठीक आहे, पण जे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिले आहे त्यात मंत्रिपदाचे गाजर आणि विकास निधी त्याचबरोबर 50 कोटी रुपये दिल्याची चर्चा आहे, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्वार्थासाठी त्यांचा हा शिवसेना शिंदे गटाचा प्रवेश झाला हे तितकेच खरे आहे. परंतु त्यामुळे ओमराजेंना जो गद्दारीचा शिक्का लागला तो वेगळाच आहे. त्यांचे सोशल मीडियावरचे 15 हजार फॉलोवर्स एका दिवसाला कमी झाले आहे. परंतु त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. ते गद्दार उजळ माथ्याने वावरू शकतात. या प्रवेशानंतर उद्धव ठाकरे हे त्यांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेणार आहेत. आणि त्या सभेत ते कार्यकर्त्यांशी हितगुज करणार आहेत. पहिल्यांदा यवतमाळला संजय देशमुख या खासदाराच्या मतदारसंघात जाऊन ते भाषण देणार आहेत. परंतु खासदारांनी चोरून लपून कायद्याची पळवाट शोधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, याबदल्यात त्यांनी आपल्या खासदारांचा राजीनामा देऊन प्रवेश केला असता आणि त्या पदाच्या चिन्हावर पुन्हा निवडून येण्याची हिंमत त्यांनी केली नाही. त्यामुळे त्यांना टायगर म्हणण्याऐवजी पळकुटे सरदार म्हणावे लागेल. संजय दिना पाटील यांनी मात्र सिक्युरिटीची गरज नाही, असे म्हटल्याचे कळते. जेव्हा ते मुंबईत येतील तेव्हा शिवसैनिकांकडून जो राडा होईल तेव्हा त्यांना कळेल की ऑपरेशन तुडवा काय असते ते. एकंदरीत जे झाले ते काही चांगले झाले नाही. अशाने कोणताही पक्ष संपत नसतो. बाळासाहेब हयात असताना त्यांच्या उपस्थितीत छगन भुजबळ आणि काही आमदारांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा छगन भुजबळ सह इतर आमदार जीव वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. त्यांना ऑपरेशन तुडवाच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पळता भुई थोडी झाली होती हे आठवण ताजी आहे.
दुसरी धक्कादायक घटना म्हणजे नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा अधिकृत उमेदवार दराडे याचा झालेला दारून पराभव होय. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या मतदार माघारीनंतरही गोकुळ गीते हे निवडून येतात ही खरी मेख आहे. त्यामुळे गोकुळ गीते यांच्या मनधरणीसाठी गिरीश महाजन, मंत्री सावंत यांनी जंग जंग पछाडले होते. अखेर मनधरणी झाली. त्यांनी पत्रकार परिषदही घेतली आणि सांगितले की मी माझी उमेदवारी मागे घेत आहे. आणि महायुतीचे उमेदवार दराडे यांना आपण सर्वांनी मतदान करावे असे गोकुळ गीते यांनी सांगितले असतानाही महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होतो, या इतकी नामुष्की कोणती नाही असे म्हणावे लागते. शिवसेना शिंदे गटातर्फे सर्व मतदार विशेषतः नाशिक मधील मतदारांना मतदानाच्या दिवशी बाहेर काढण्यात आले तरीही अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे दणदणीत मतांनी निवडून आले, याला काय म्हणावे. त्यांनी घरात बसून आपला आपला प्रचार केला असेही म्हणता येत नाही. जाहीर प्रचार दराडे करीत होते तरीसुद्धा त्यांचा पराभव झाला. म्हणजे महायुती म्हणजे शिवसेनेचे उमेदवाराला मतदान करण्याची मतदारांची मानसिकताच नव्हती, असे म्हणावे लागेल. परंतु हा शिंदे सेनेसाठी फार मोठा धक्का मानला जातो आहे. आधीच चार उमेदवारांवर विधान परिषद निवडणुकीची तडजोड झाली. त्यात एक जागा अशा पद्धतीने अधिकृत महायुतीचे उमेदवारालाच पराभव झाला. त्यामुळे ऑपरेशन टायगर आणि नाशिकचा निकाला या दोन्ही गोष्टी धक्कादायक आहेत. तरीसुद्धा एकनाथ शिंदे तळजोडी शिवाय काहीही करू शकणार नाहीत. भाजपची ही जागा मूळ असल्याने अपक्ष उमेदवार जरी असला तरी भाजपचाच उमेदवार आहे, असे म्हणावे लागते. आता गोकुळ गीतेला गळ घालण्यात येत आहे की तुम्ही शिवसेना शिंदे गटात प्रवेश करावा.. ते होणे शक्य नाही..!


