मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नजर असल्याचे बोलले जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात या ‘संभाव्य फोडाफोडी’विषयी चर्चा होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. आज मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा इशारा, शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी दिला होता. मात्र तूर्तास तांत्रिक अडचणींमुळे शिवसेना ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याची माहिती आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ठाकरे गटाच्या खासदारांचा पक्षप्रवेश अपेक्षित होता. परंतु तांत्रिक अडचणींमुळे तो लांबणीवर पडल्याचे म्हटले जाते. ठाकरे गटाचे सध्या नऊ खासदार आहेत. पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी किमान दोन तृतीयांश म्हणजेच सहा खासदारांनी पक्ष सोडण्याची गरज आहे. परंतु तशी जुळवाजुळव न जमल्यामुळे फटका बसू शकतो. त्यामुळे मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश रखडल्याची चर्चा आहे.
मात्र शिवसेनेच्या बीकेसीमधील मेळाव्यात स्थानिक नेत्यांचे पक्षप्रवेश होणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील जय- पराजय बाजूला ठेवून दोन्ही शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला पराभवाचा जबर धक्का बसला. विधानसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर ठाकरे गटात प्रचंड नाराजी पसरल्याचे बोलले जाते. अनेक माजी आमदार आणि निवडणुकीतील पराभूत उमेदवार ठाकरे गटाची साथ सोडण्याच्या मनःस्थितीत असल्याचीही चर्चा आहे. अशातच पक्षाने विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा न केल्याने पक्षातील काही आमदारही नाराज आहेत. याशिवाय विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणीही शिवसैनिकांकडून केली जात आहे.