लोकशाही न्यूज नेटवर्क
पावसाळ्याच्या दिवसात बऱ्याचदा दूषित पाणी पुरवठा होत असल्याने साथरोगांचा फैलाव होत असल्याचे समोर आले आहे. तर काही वेळेस डायरियाची लागण होत असते. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील पिंप्री या गावात दूषित पाणी पुरवठ्यामुळे अनेकाना डायरियाची लागण झाली आहे. यामुळे गावात एन सणासुदीच्या काळातच ग्रामस्थ आजारी पडले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामधल्या दुर्गम अशा पिंप्री आडगाव या गावात दिवाळीच्या दिवशी अतिसाराची लागण मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या गावांमध्ये नळ योजना अद्याप झालेली नाही. गावात नळ योजना कार्यान्वित नसून ग्रामस्थांना एका विहिरीवरून पाणी भरावे लागते. विहिरीला जे झरे फुटलेले आहेत ते दूषित पाण्याचे असल्यामुळे या ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान पिंप्री गावात अतिसाराची लागण झाल्यानंतर खरंतर आरोग्य यंत्रणा या ठिकाणी पोहोचायला हवी होती. मात्र ग्रामस्थांनी आरोप केलाय की यंत्रणा या ठिकाणी पोहोचलीच नाही. यामुळे त्रास होत असलेल्या नागरिकांना खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. याकरिता किमान सात किलोमीटर दूर कच्चा रोड पार करत वानखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते.
मुळात गावात नळ योजना होणे अपेक्षित होते. मात्र योजना राबविण्यात आली नसल्याने ग्रामस्थांना पाण्याची समस्या भेडसावत असते. तहान भागविण्यासाठी गावाजवळील विहिरीचा आधार घ्यावा लागत आहे. या विहिरीतील असलेल्या पाणी दूषित असल्याने ग्रामस्थांना याचा त्रास जाणवू लागला आहे. दिवाळीच्या दिवशीच गावावर अतिसाराचे संकट गावावर आल्याने नागरिक हैरान झाल्याच चित्र आहे.