साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय योगदान दिलेल्या व्यक्ती किंवा संस्था यांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनीधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने राज्यस्तरीय कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार २०२५ करीता साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय योगदान दिलेल्या व्यक्ती किंवा संस्था पैकी एकास पुरस्कार देण्याकरीता दि. ५ मे, २०२५ पर्यंत पुरस्कारांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
साहित्य क्षेत्रातील पुरस्कार देण्याकरीता इच्छूक व्यक्ती / संस्था यांचे कार्य पुढील प्रमाणे असावेत. अ) ग्रामीण साहित्य आणि काव्य ही बहिणाबाई चौधरी यांच्याव्यक्तिमत्वाची ओळख असल्यामुळे हा मध्यवर्ती केंद्रबिंदू असणाऱ्या साहित्याचा विचार केला असावा. ब) हा पुरस्कार केवळ मराठी साहित्यासाठी देण्यात येईल. क) व्यक्ती अथवा संस्था यांच्या साहित्य क्षेत्रातील गेल्या १५ वर्षातील योगदानाचा विचार केला जाईल. ड) साहित्य हे मानवी भाव-भावनांचे, सुख-दु:खाचे आणि मूल्याधिष्ठीत निर्मितीसाठी कटीबध्द असावे. इ) ज्या सामाजिक परिवेशातून साहित्य निर्मिती झाली आहे. त्या परिवेशाची सामाजिक नाळ ही बहिणाबाई चौधरी यांच्या तत्त्वज्ञानाशी निगडीत असावी.या पुरस्काराची विस्तृत माहिती, अर्जाचे नमुने विद्यापीठाच्या nmu.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या घेतला असून हा पुरस्कार शिक्षण / सामाजिक / कृषि / साहित्य या चार क्षेत्रापैकी एका क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या एक व्यक्ती किंवा एका संस्थेला दरवर्षी एका क्षेत्रा करीता पुरस्कार देण्यात येतो. तरी इच्छूक व्यक्ती / संस्था पुरस्कारासाठी ५ मे २०२५ पर्यंत पुरस्काराचे प्रस्ताव कुलसचिव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या पत्त्यावर बंद पाकिटात पाठवावेत असे आवाहन कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे.