भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सामाजिक समता कार्यक्रमांची सुरुवात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

नवी मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंतीनिमित्त  सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली असून पुढील 10 दिवस कोकण विभागात विविध उपक्रमाद्वारे महामानव डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त कोकण विभाग श्रीम.वंदना कोचुरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

राज्यातील सर्व जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दि. 06 एप्रिल ते दि. 16 एप्रिल या कालावधीत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम” राबविण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. यानुसार, कोकण विभागातही पुढील दहा दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी कोकण विभागात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा कोकण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीम. वंदना कोचुरे यांनी सांगितली.

असे असतील सामाजिक समता कार्यक्रम…

सामाजिक न्याय विभागाने शासन परिपत्रकान्वये दिलेल्या सुचनेनुसार, कोकण विभागात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दि.07 एप्रिल रोजी विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येतील.

दि.08 एप्रिल रोजी, जिल्ह्यामधील स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात येईल.दि. 09 एप्रिल रोजी, ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम राबविण्यात येतील. जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने कोकण विभागाच्या शैक्षणिक आस्थापनांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जातील.दि. 10 एप्रिल रोजी, समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहिती बाबत प्रबोधन करण्यात येईल.

तसेच भारतीय संविधानाची जनजागृती व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर पथनाट्य होणार आहेत.दि. 11 एप्रिल रोजी, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करून विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल.दि. 12 एप्रिल रोजी, मार्जिन मनी योजनेच्या जनजागृती बाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येतील.

दि. 13 एप्रिल रोजी, संविधान जागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. दि. 14 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या कोकण विभागातील सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थपनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला असून त्याठिकाणी, व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित करण्यात येईल.

याच दिवशी सर्व कोकण विभागातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यामार्फत ऑनलाइन जात पडताळणी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. दि. 15 एप्रिल रोजी कोकण विभागातील समाजकल्याण कार्यालयात महिला मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये महिलांविषयी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील. तसेच तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

दि. 16 एप्रिल या अंतिम दिवशी, ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कोकण विभागामध्ये आयोजित या कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त श्रीम.वंदना कोचुरे यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेस आणि कार्यक्रमास मोठी उपस्थिाती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.