काठमांडू ;– नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला असून आतापर्यंत १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. ४८ मिनिटांत चार जोरदार भूकंपांनी नेपाळला पुन्हा एकदा विनाशाच्या मार्गावर नेलं. रस्त्यावर भेगा पडल्या आणि अनेक घरे जमीनदोस्त झाली. भूकंप झाला त्यावेळी बहुतांश लोक झोपले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. शुक्रवारी रात्री दिल्ली एनसीआरसह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक शहरं भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले. २०१५ मध्ये नेपाळमध्ये झालेला भूकंप लोकांना आता पुन्हा एकदा आठवला.
शुक्रवारी रात्री नेपाळमध्ये चार भूकंप झाले. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल वैद्यकीय पथकासह जजरकोट भागात जात आहेत. पंतप्रधानांचे प्रेस सल्लागार गोविंद आचार्य म्हणाले की, औषधे आणि हेलिकॉप्टरसह आरोग्य पथक तयार करण्यात आले आहे, परंतु खराब हवामानामुळे त्या भागात पोहोचण्यास थोडा उशीर झाला आहे. नेपाळमधील या भूकंपाचा केंद्रबिंदू जजरकोटचं रमीडांडा हे होतं. त्यामुळे या भागात सर्वाधिक नुकसान झालं आहे.
नेपाळमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीमुळे आपण अत्यंत दु:खी आहोत. भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. आमच्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत आणि आम्ही जखमींना लवकरात लवकर बरे व्हावं यासाठी प्रार्थना करतो, असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.