मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशामुळे राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला काही नेते सोडचिठ्ठी देणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला निमित्त ठरले ते सोमवारी पक्षाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट. तर दुसरीकडे शिराळ्याचे माजी आमदार मानसिंग नाईक आणि श्रीगोंदा मतदारसंघात पक्षाच्या विरोधात जाऊन निवडणूक लढविल्याने निलंबित झालेले राहुल जगताप यांनी अजित पवार यांची त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवानंतर मविआतील नेते संपर्कात असल्याचा दावा महायुतीतील नेते सातत्याने करत आहेत. त्यातच शरद पवार यांची साथ सोडण्यास अनेक नेते तयार असल्याचेही राष्ट्रवादीतर्फे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी-शप पक्षाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी थेट सागर बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यात असून बाळ्यामामा यांनीही या भेटीचे कारण स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, शिराळ्याचे माजी आमदार मानसिंग नाईक यांनी अजित पवार यांची देवगिरी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. नाईक यांनी शिराळा मतदारसंघातून यंदा निवडणूक लढवली होती परंतु, त्यांचा भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झाला.
दोघेही राष्ट्रवादीत जाणार?
श्रीगोंदा मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविल्याने निलंबित झालेल्या राहुल जगताप यांनीही पवार यांची भेट घेतली. जगताप हे निवडणूक लढविण्यासाठी आग्रही होते परंतु, मतदारसंघ शिवसेना उबाठा या पक्षाला सोडल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे ठरवले. त्यामुळे ऐन निवडणुकीदरम्यानच त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. जगताप व नाईक हे दोघेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.