लोकशाही संपादकीय लेख

जळगाव विधानसभा परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेच्या नगरसेविका अपक्ष उमेदवार रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर आपली अपक्ष बंडखोरी उमेदवारी माघारी घेऊन महायुतीचे उमेदवार भाजपचे नंदू महाजन यांना पाठिंबा दर्शवल्याने भाजपचे नंदू महाजन यांची बाजू आता भक्कम झाली आहे. अपक्ष उमेदवार रेश्मा काळे या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपली उमेदवारी त्यांनी मागे घेतली आणि नंदू महाजन यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मला मतदान करण्याऐवजी भाजपचे नंदू महाजन यांना मतदान करावे, असे त्यांनी मतदारांना आवाहन केले आहे. नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटल्यानंतर रेश्मा काळे यांनी आपली अपक्ष बंडखोरी माघार घेऊन जळगावचाही तिढा सोडविला आहे. त्यामुळे आता चौरंगी लढती ऐवजी तिरंगी सामना होत आहे. या तिरंगी सामन्यांमध्ये भाजप म्हणजे महायुतीचे नंदू महाजन महाविकास आघाडीचे म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे शरद तायडे आणि अपक्ष अनिल चौधरी यांच्यात ही रंगत होत आहे. तसे पहिले तर महायुतीचे उमेदवार नंदू महाजन आणि महाविकास आघाडीचे शरद तायडे यांच्यात हा सामना होणार आहे.
तिसरे अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना काही अपक्षांची मते मिळतील एवढेच. परंतु अनिल चौधरी यांची प्रचाराची एक फेरी संपलेली आहे, असे सांगतात. तसेच पहिली बैठक भुसावळ येथे घेण्यात आली, त्याला 109 सदस्य उपस्थित होते असे देखील सांगण्यात येते. हे 109 सदस्य उपस्थित असणाऱ्यांपैकी सर्वच जण अनिल चौधरी यांचे पाठीराखे असतीलच असे सांगता येत नाही. त्यात अनिल चौधरी सांगतात किंवा प्रचारादरम्यान प्रचार करतात की, भाजपचे नंदू महाजन उमेदवारी मिळाली हे जरी खरे असले तरी त्यांना नगरपालिकांचा अनुभव काही विशेष नाही. माझ्याजवळ 35 वर्षे नगरपालिका भुसावळचा अनुभव आहे. त्यामुळे भाजपचे सदस्य सुद्धा मला मतदान करतील. नंदू महाजन यांना अनुभव नाही असा दावा करणारे अनिल चौधरी हे विसरतात की नंदू महाजन हे जिल्हा परिषद जळगावचे उपाध्यक्ष होते. म्हणजे त्यांना संपूर्ण ग्रामीण भागाचा पूर्ण अनुभव आहे. त्यामुळे अनिल चौधरींच्या या म्हणण्याला काही अर्थ उरत नाही कारण त्यांना फक्त एका भुसावळ नगरपालिकेचा अनुभव असला म्हणजे काय झाले? इथे तर संपूर्ण जिल्ह्याचा अनुभव महाजन यांना आहे.
मतदार सदस्यांच्या आकडेवारीचा विचार केला तर भाजपकडे 250 मते आहेत. शिवसेनेकडे 160 सदस्य आहेत. 250 अधिक 160 म्हणजे 410 सदस्य संख्या झाली. त्यातच एकूण 85 सदस्य हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. अपक्ष सदस्यांचा ओढ हा नेहमी सत्ताधारी पक्षाकडे असता, हे अनिल चौधरींना माहीत नाही काय? 410 आणि 85 अपक्ष सदस्यांपैकी बहुसंख्या मते ही भाजप सत्ताधारी पक्षाला मिळतील आणि ती 450 ते 475 इतकी आकडेवारी होते. म्हणजे महायुतीचे सदस्य आणि अपक्ष मिळून प्रचंड बहुमताने नंदू महाजन यांचा विजय होणार आहे. त्यात यावल नगराध्यक्ष छाया पाटील या आज रोजी भाजप कार्यालयात उपस्थित होत्या. त्या आहेत ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष आणि ठाकरे गटाचे 13 नगरसेवक यावल नगरपालिकेत निवडून आले आहेत. छाया पाटील म्हणाल्या की आमचे राजकारणाव्यतिरिक्त वैयक्तिक संबंध आहेत. आमचा एक पेशंट मुंबईला दाखल करण्यात आला आहे. त्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आम्ही भाजप कार्यालयात गेलो होतो. ते म्हणायला ठीक आहे. पण ही वेळ साधली काय? असे म्हणावे लागते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काही सदस्य आहेत. तेही त्यांनाच मतदान करतील.
दरम्यान हा सामना नंदू महाजन विरुद्ध शरद तायडे असा होणार आहे. शरद तायडे यांच्याकडे महाविकास आघाडी 100 ते 125 मध्ये आहेत. ती त्यांना मिळतील किंवा त्यातही फटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून नंदू महाजन हे भावी आमदार म्हणायला हरकत नाही. त्यातच गिरीश महाजन म्हणतात की, शरद तायडे यांच्याशी आमची बोलणी सुरू आहे. त्यामुळे काय होते ते बघावे लागेल. परंतु अनिल चौधरी अपक्ष उमेदवाराला काही मोठा प्रतिसाद मिळेल असे वाटत नाही. महायुतीचे सर्व आमदार एकत्र येऊन एकमताने निर्णय घेतला आहे की महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करायचे. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील, मंत्री संजय सावकारे, आमदार राजू मामा भोळे, मंत्री गिरीश महाजन यांनी एकत्र येऊन एकमताने महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता मतांची फटाफट होण्याचे शक्यता फार कमी आहे..!


