कॉंग्रेसचा उद्या राजभवनाला घेराव, जेलभरो आंदोलन – नाना पटोले

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची (Central Government) चुकीची धोरणे कारणीभूत आहेत म्हणून शुक्रवारी (५ ऑगस्ट) राजभवनला घेराव घालण्याची आणि जेलभरो आंदोलन करण्याची घोषणा नाना पटोलेंनी (Nana Patole) केली आहे. केंद्रातील भाजप (BJP) सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तुंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पहात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (INC) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

“पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. मोदी सरकारने जीएसटीतून शाळकरी मुलांनाही सोडले नाही, शालेय वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयात उपचार घेण्यावरही जीएसटी भरावा लागणार आहे.”

तसेच बेरोजगारीचा उच्चांक झाला असून तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. “मागील ४५ वर्षातील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. २०१४ ते २०२२ पर्यंत विविध विभागांमध्ये नोकऱ्यांसाठी २२ कोटी अर्ज मिळाले मात्र केवळ ७ लाख उमेदवारांना नोकरी देण्यात आल्याचे केंद्र सरकारनेच लोकसभेत सांगितले आहे. एवढी भयानक अवस्था आहे. तर लष्करात भरती होऊन देशाची सेवा करु पाहणाऱ्या तरुणांना फक्त ४ वर्षाची सेवा व नंतर निवृत्ती अशी ‘अग्निपथ’ नावाची योजना आणली आहे,” असं मत नाना पटोलेंनी व्यक्त केलं.

“या योजनेला तरुण वर्गांचा तीव्र विरोध असून काँग्रेस पक्ष तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी. अतिवृष्टीमुळे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,” अशा मागण्या पटोलेंनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केली.

काँग्रेस (INC) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत (Mumbai)  उद्या सकाळी ११ वाजता हँगिंग गार्डन (Hanging Garden) ते राजभवन (Rajbhavan) असा मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाईल. त्यानंतर जेलभरो केले जाणार आहे. राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयी स्थानिक नेते आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवतील, अशीही माहिती काँग्रेसने दिली आहे.

नाना पटोले राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवरही (Bhagatsingh Koshyari) बोलले. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्राचा व महापुरुषांचा अवमान करत असतात. मुंबईबद्दल बोलूनही त्यांनी मराठी माणसांचा अवमान केला आहे. कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असून त्यांच्या बोलण्यातून भाजपा व आरएससची शिकवणच नेहमी दिसून येते.”

Leave A Reply

Your email address will not be published.