इंदौर येथे श्री गुरूचरित्र पारायण सप्ताह व दत्त जन्मोत्सव संपन्न

0

इंदौर, लोकशाही न्यूज नेटवर्क

श्रीक्षेत्र इंदौर येथे प. पू. नाना महाराज तराणेकर संस्थान येथे ३० नोव्हेंबर ते ९ डिसेंबर रोजी श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह व महोत्सवास दिनांक ३० रोजी सायंकाळी सामुहिक सत्संगाने (करुणात्रिपदी) सुरुवात झाली.

यूट्यूब लिंक👇

दि. १ डिसेंबर गुरुवार रोजी सकाळी ६ वाजता काकड आरती, ध्यान धारणा, पुजा अभिषेक, श्री गणपती अथर्वशीर्ष पुरुषसुक्त, स्त्रीसुक्त, लक्ष्मीसुक्त, विष्णूसुक्त, रुद्राभिषेक (ऋग्वेदी व यजुर्वेदी पध्दतीने) असे ६.३० ते ८ वाजेपर्यंत नित्य कार्यक्रम होत असे. त्यानंतर ८ ते १०.३० प्रभाती भजनाचा सामुहिक कार्यक्रम), १०.३० ते १ वाजेपर्यंत गुरुचरित्र सप्ताहानुसार वाचन वेशास श्री जोशी काका (इंदौर) हे अनेक वर्षापासून वाचन करतात. त्याच लाभ बाहेरगावाहून आलेले भक्त स्थानिक भक्त भगिनी वर्ग लाभ घेतात. दुपारी १२.३० ते २.३० महाप्रसाद, २.३० ते ४ भजन किर्तन, दुपारी ४.३० ते ६ किर्तन व्याख्यान, भोजनोत्तर रात्री ९.३० ते ११ भजन शाखीय गायन, प्रवचन असे कार्यक्रम नित्य नियमाने होत असत. रोज सकाळी ६.३० ते ११ वैयक्तिक गुरुचरित्र वाचन दोन बॅच मध्ये तसेच सकाळी ६.३० ते रात्री ८ पर्यंत चक्रपारायण व पहारा (विणावादन व टाळ वादन हळू आवाजात डिगंबरा डिगंबरा चा जप असे कार्यक्रम नित्य होत असत. रोज सायंकाळी ६.३० ते ८.३० आरती करुणात्रिपदी व चितन / उदबोधन प. पू. डॉ. बाबासाहेब तराणेकर असा कार्यक्रम होत असे.

या उत्सवाचे पू. बाबासाहेब तराणेकर यांचे रोज सायंकाळी होणारे चिंतन व प्रबोधन हे महत्त्वाचे वैशिष्टय असे. सुरुवातीलाच आपला हा ७३ वा उत्सव असून दोन वर्षांनी आपण ७५ वा अमृत महोत्सव साजरा करू. आपण रोज जी मंत्रपुष्पांजली म्हणतो, त्यात चारही वेदांच्या ऋचा, अरण्यक आहे. आपली त्रिपदी आपल्या पध्दतीनुसार आता अनेक दत्त क्षेत्रात म्हटली जाते. आरती नंतर ज्या निरनिराळ्या गायत्री आपण म्हणतो, ते आपले आगळेवेगळे वैशिष्टय आहे. महिलांचा देखील यात लक्षणीय सहभाग असतो. दररोज होणाऱ्या अध्यायांबाबत देखील त्यांनी संक्षिप्त मार्गदर्शन केले. संदीपकाच्या निमित्ताने अढळ गुरुनिष्ठा, अविचल भक्ती, दत्त जन्माचे रहस्य गोकर्ण महाबळेश्वर अध्यायाच्या निमित्ताने रावणाला असलेले संगीताचे ज्ञान, त्या अध्यायात असलेले रूपक, सामगायन, निरनिराळे राग, यासवधी देखील त्यांनी विवेवच केले. चौथ्या दिवशी दोन अहंकारी ब्राह्मण जयपत्र मागण्यासाठी आलेले असता या अध्यायाच्या निमित्ताने वेद जाणण्यायोग्य जे ज्ञान त्याचा समावेश वेदांतात आहे.

शुक्ल यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद, ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यांच्या वेगवेगळ्या शाखांबाबत सांगून सर्वांच्या एकूण ११३० शाखा आहेत. शतपत ब्राह्मण, अरण्यक, वृहद उपनिषद, अशाखा, हा सगळा विस्तार एक शाखा त्याचा विस्तार हे सुध्दा आयुष्यभर पुरेल. चार वेदांचे हे सर्व ज्ञान चार पुस्तकात मावणारे नाही. सायन्सच्या शाखांमध्ये हे सामावणारे नाही. पाश्चीमात्यांनी याचा इंग्रेजी अनुवाद करून ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला. हे सगळे वेदांतामधून महाभारत, रामायम ती स्मृती यात आहे. गुरुचरित्र कारानी वेदांची माहिती व्हावी म्हणून केलेले विवेचन या अध्यायात आहे. आपण कोणत्या वेदाचा अभ्यास करावा, मंत्र म्हणावेत, अभ्यास करावा याचे मार्गदर्शन आपणास यातून मिळू शकते पाचव्या दिवशी प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची जी आरती आपण म्हणतो त्याचा अर्थ समजावून सांगितला.

सौऽहम (प्राणायाम) स श्लेष वापरला आहे हंस हा विष्णूचा अवतार. मनाच्या ठिकाणी हृदयात राहणारा (हंस मानसहंस) चैतन्यशक्ती, वासस्ते ते नरसिंहसरस्वती. गुरुकृपा ही केवलम् बाबत विवेचन केले. तसेच आज दुपारच्या वेळेत श्री. जयंतराव तेलंग यांचे गुरुचरित्र विषयी झालेले व्याख्यान हे उत्तम होते असे सांगितले. सहाव्या दिवशीच्या प्रबोधनात (चिंतनात) गुरुजींनी ऋग्वेदी पध्दतीनुसार म्हटलेल्या मंत्रपुष्पांजली विषयी सांगून दिगंबरा दिगंबरा यति यति गुरुवरा या आरतीत ज्ञान, कर्म, भक्ती, याचे विवेचन असून तीन दिगंबर १. प्रत्यक्ष ब्रह्म २ पूर्ण ब्रह्म, ३. गजेंद्र मोक्षज्यरि ५ दत्तस्तरूप ब्रह्म याबाबत विवेचन करून या आरतीबाबत व दिगंबरा दिगंबरा मंत्राचा विषय यावर पू दत्तमहाराज कविश्वर यांनी ४५ मिनिटे प्रबोधन केले होते याची आठवण सांगितली. तसेच सत्यनारायण पूजेस बसण्यास नवीन लोकांना आपण प्राधान्य देत असतो असे सांगितले.

भजनाच्या कार्यक्रमात अनुक्रमे १. स्वरचीत महिला भजनी मंडळ इंदौर, २. नाना महाराज तराणेकर भजनी मंडळ इंदौर, ३. पर्व महिला मंडळ, लोकमान्य महिला मंडळ, ४. भक्तांगण भजनी मंडळ कांदिवली मुंबई ५. गीतांजली महिला भजनी मंडळ इंदौर, किर्तन अनुक्रमे हभप श्री संकेत भोळे बड़ोदा दोन दिवस, २. हभप श्री. सुधीर सुभेदार इंदौर. ३. हभप श्री. माधव धुमकेकर नागपूर दोन दिवस, ४. भास्करबुवा इंदोरकर दोन दिवस.

दि. ५ व ६ रोजी श्री गुरुचरित्र व्याख्यान श्री जयंत तेलंग इंदौर यांनी अत्यंत उदबोधक मार्गदर्शन क्यानकाद्वारे केले. रात्रीच्या कार्यक्रमात अनुक्रमे श्री सच्चिदानंद भजनी मंडळ देवास (गत ४० वर्षांपासून), शास्त्रीय गावन रोज अनुक्रमे १. श्री. सुनिल मसूरकर (तानसेन पुरस्कार) २. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त श्री. भुवनेश कोमकली (देवास). ३. सौ. जाई धायगुडे मुंबई, ४. सर्वाच्या परिचित सौ. शुभदा मराठे इंदौर, प्रवचन दि. ६ रोजी सौ. स्नेहलता शिनखेडे सोलापूर (अनेक पुरस्कार प्राप्त साहित्यिक, ग्रंथलेखक) यांचे प्रवचन झाले. प. पू. नाना महाराज व देंगे स्वामी महाराज यांच्या जीवनातील अनेक मंत्रमुग्ध करणारे उदाहरणे त्यांनी दिलीत.

दि. ७ बुधवार रोजी दत्त जयंतीच्या दिवशी दररोज होणाऱ्या गुरुचरित्राचे अनेक वर्षापासून प्रतिवर्षी वाचन करणारे श्री जोशी काका इंदौर यांचा दुपारी १२.३० वा. प.पू. बाबा महाराज तराणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांचे प्रबोधन देखील झाले. यावेळेस सौ जयाताई तराणेकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, महिला व अन्य काही जण नेहमीच सत्पशती गुरुचरित्राचे पारायण करीत असतात, त्याचे वाचन किती सखोल असू शकते.. त्याचे वाचन नव्हे तर संशोधन, गुढार्थ, शब्दाचे सामर्थ्य, जोडाक्षराचे महत्त्व. सुरुवात आणि समापन, उत्तम ग्रंथ, संसार तरून जाण्याचा मार्ग सोपा शब्द सोपान भक्तीमार्ग, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग याच्या पायऱ्या या संदर्भात अचूक मार्गदर्शन केले.

याच दिवशी सायंकाळी खुप उत्तम रांगोळी व आकर्षक सजावट करण्यात आली होती. दत्तजयंतीचे सुश्राव्य किर्तन हभप भास्करबुवा इंदौरकर नागपूर यांचे झाले (गत १६ वर्षापासून ते येथे येत आहेत), महाजारती नंतर तराणेकर परिवाराने औक्षण केले. पाळणा म्हटला गेला. त्यानंतर समयोचित भजन म्हटल्यावर करुणात्रिपदी झाली. यादिवशीच्या सत्संगात माजी खासदार, मा. लोकसभेच्या अध्यक्ष व प. पू. नानांच्या शिष्या श्रीमती सुमित्राताई महाजन या ५० मिनिटे सहभागी होत्या. त्यांचा श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या संपूर्ण उत्सवाच्या कालावधीत अनेक मान्यवर, सामाजिक, लोकनेते संत महापुरुष यांनी भेटी दिल्या. त्यांच्या देखील यथोचित सत्कार करण्यात आला. रात्री नित्याप्रमाणे १०.३० पासून पहाटे ७ वाजेपर्यंत श्री. संजूभैय्या व भजनप्रेमी बंधू भगिनी यांनी भजन, भारुड, गवळण इ. प. पू. नाना महाराज तराणेकर भजनी मंडळ इंदौर यांच्या त्या कार्यक्रमात सर्वच भक्तत्राण रंगून गेले होते. दि. ८ गुरुवार रोजी सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण सत्यदत्त पूजनाचा कार्यक्रम झाला यात १०८ जणांनी सहभाग घेतला. पौरोहित्य श्री गाडगीळ गुरुजी (नगर) यांनी केले. बाहेर गावच्या महिला व भक्त मंडळीचा सहभाग लक्षणीय होता. दुपारी १२.३० नंतर महाप्रसादाचा लाभ २५०० पेक्षा जास्त भक्तांनी घेतला.

दि. ९ शुक्रवार रोजी सकाळी प्रभाती प्रत्येकाने प. पू. नानांचे औक्षण केले. नंतर श्रींची पालखी निघाली. प.पू. नानांच्या स्थळावरून चौफुली करून रामबागेतून गणेश मंडळाकडून परत आली. (सकाळी १० ते १२.३०) अनेकांनी श्रीच्या पालखीचे उत्साहवर्धक स्वागत केले. सर्व बंधुभगिनींनी भजन, दिंडी, फुगडी, यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. परत आल्यानंतर हॉलमध्ये पुन्हा भजन, फुगडी, गोपाळकाला झाला व महाप्रसादाने कार्यक्रम संपन्न झाला. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवाचे व्यवस्थापन, चारही पिढ्यांचा सहभाग व उच्चशिक्षित अगदी विदेशातून आलेले तरूण महिला पुरुष १८ तास सतत सेवा देत असतात, हे अनुभवण्यासारखे व प्रेरणादायी आहे. बाहेरगावी जाणाऱ्या भक्तांना आवश्यकतेनुसार शिदोरी देण्यात येत होती. या उत्सवात संपूर्ण महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, माळवा, मध्यप्रदेश हैद्राबाद, कर्नाटक, युएस, कॅनडा, विदेशातून देखील भक्तगण आले होते. दोन वर्षानंतर याचा लाभ घेणान्या भक्तांना चैतन्य उर्जा प्राप्त होवून ते स्थानिक ठिकाणी गेले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.