लोकशाही संपादकीय लेख
“औरंगजेबाची कबर उध्वस्त करा.. अन्यथा आम्ही काढून टाकू..” अश्या प्रकारचा इशारा देणारे आंदोलन बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद संघटनांनी औरंगाबाद येथे केले. तसेच राज्यात ठिकठिकाणी अशी वक्तव्य केली गेली. महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांचे सुद्धा मुस्लिमांच्या विरोधात वक्तव्य प्रसिद्ध होत आहेत. भाजपचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी “औरंगजेबांची औरंगाबाद येथील कबर जेसीबीने उध्वस्त करा” अशी मागणी केली. त्यातच संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात संभाजीराजेंवर औरंगजेबाने केलेल्या अतोनात छळाच्या दृश्यमुळे हिंदू समाजाची माथी भडकली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलेलेच आहे. त्याचा परिणाम म्हणजे नुकतीच नागपूर या महाराष्ट्राच्या उपराजधानीत झालेली दोन गटातील दंगल होय. दिनांक १७ मार्च रोजी सकाळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने ‘औरंगजेबाची कबर काढून टाका’ या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. त्यात औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीचे दहन करण्यात आले. या कबरीचे दहन करताना हिरव्या कपड्यावर काहीतरी वाक्य लिहिली होती, असे म्हटले जातेय. या घटनेच्या संदर्भात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल केला गेला. त्यानंतर नागपूर शहरात शांतता होती. परंतु दुपारनंतर कुठल्यातरी मशिदीतून नमाज अदा करून काही मुस्लिम बांधव बाहेर आले आणि त्यांच्याकडून दगडफेक करायला सुरुवात झाली. हा प्रकार नागपूरच्या महाल भागात होत होता. त्याचे लोन दुसरीकडेही पसरले.
काही घरांवर व संस्थांवर दगडफेक झाली. या जमावाला नियंत्रणात आणणाऱ्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. त्यात पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांसारख्या अधिकाऱ्यांवरही दगडफेक झाली. एका उपायुक्तांवर धारदार कुऱ्हाडीचा वार देखील करण्यात आला. जमावाच्या दगडफेकीत आयुक्त, उपायुक्त आणि 33 पोलीस जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठी चार्ज आणि अश्रू धुराचा वापर केला, तेव्हा जमाव काबुत आला. याप्रकरणी सुमारे ८० जणांना पकडण्यात आले असून ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सध्या नागपूर शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी, आतून ते धगधगते आहे. या दंगलीत सर्वसामान्य पाच नागरिक जखमी झाले असून चार जणांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे. एक जण गंभीर जखमी असून त्याचे आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
सध्या महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू असून अधिवेशन नागपूरच्या दंगलीने गाजले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांततेचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असला, तरी जीवनावश्यक प्रश्नांच्या बाबतीत आमचे राजकीय प्रतिनिधी गंभीरतेने दखल घेत नाहीत. त्यानुसार लोकांची माथी भडकतील अशी भावनिक वक्तव्य केली जातात. त्याला आळा घालणे आवश्यक आहे. मंत्री नितेश राणे हे तर त्यांच्या मत्स्य खात्याच्या संदर्भात काहीच न बोलता मत्स्य विभागाच्या समस्या सोडवण्याऐवजी मुस्लिम समाजाची माथी भडकवितात. माथी भडकतील अशी वारंवार वक्तव्य करतात. त्यांच्या अशा वक्तव्यांवर आळा घातला गेला पाहिजे. त्यांना आवर घातला गेला पाहिजे. कायद्याने औरंगजेबाची कबर महाराष्ट्र शासन काढू शकत नाही. म्हणून औरंगजेबाच्या कबरीचे पोलीस संरक्षण वाढविण्यात आले आहे. “शासनाने ती कबर काढली नाही, तर आम्ही बाबरी मशिदीसारखी ती उध्वस्त करू..” असा इशारा देणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.
किंबहुना या दोन्ही संघटनांबरोबर संवाद साधून शासनाने त्यांची समजूत तरी घालणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या आंदोलनावर बंदी घालावी, अन्यथा दुसऱ्या समाजाची माथी भडकून नागपूर मध्ये जो प्रकार घडला त्याला ते जबाबदार राहतील. याचा अर्थ कुणीही कायदा हाती घेऊ शकतो. तसे झाले तर मग ते कोणीही असो, त्यांच्यावर कडक कारवाई करावी. पोलिसांवर हल्ला करणारे जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. परंतु नागपूरची दंगलीला सुनियोजित कटाचा वास येतोय. एक ट्रॉली भरून दगड धोंडे विटा या आल्याच कशा? पोलिसांनी हे दगड आणि काही शस्त्रे जप्त केले आहेत. समाजकंटक कोणतेही जाती-धर्माचे असले तरी त्यांना जात आणि धर्म नसतो ते असतात केवळ आणि केवळ गुंड आणि समाजकंटक. अशा समाजकंटकांना पोलिसांकडून कसलीही तमा न बाळगता ठेचून काढले पाहिजे. अन्यथा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींच्या नागपूरला गालबोट लागेल. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत..!


