पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार; उपमुख्यमंत्र्यांच आश्वासन

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज हवामान विभागातर्फे विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाट वर्धा येथील पूर परिस्थितीची तात्काळ पाहणी केली. यावेळी, फडणवीसांनी शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं. विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. तर आज अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

रात्री झालेल्या पावसामुळं अनेक गावांना पुरानं वेढलं आहे. देवळी तालुक्याच्या सोनोरा ढोक इथं सुद्धा पुराच्या पाण्यानं शिरकाव केला. अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. मागील दहा दिवसात दुसऱ्यांदा गावात पाणी शिरल्यानं नागरिक संकटात सापडले आहेत. नागरिकांकडून आता गावाचे पुनर्वसन करा, अशी मागणी केली जातं आहे.

नागपूरमध्ये रविवारी पावसानं दिवसभर थैमान घातलं होतं. मात्र, सोमवार आणि मंगळवार सकाळपासून पुन्हा थोड्या-थोड्या वेळाच्या विश्रांतीनगर पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान, महानगरपालिकेनं योग्य नियोजन केलं नसल्यानं शहरातील रस्ते जलमय झाले तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसल्याचं चित्र पाहायला मिळालं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पूरग्रस्त लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरुय. सध्या वर्ध्याला पुराचा जोरदार फटका बसला असून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं त्यांनी आश्वासन दिलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.