नगरदेवळा, लोकशाही न्युज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस झाल्याने अनेक नद्यांना पुर आले आहे.
मराठवाड्यातील काळदरी परिसरात रविवारी (ता. १३) रात्री दमदार पाऊस झाल्याने अग्नावतीला सोमवारी (ता. १४) पहाटे चारच्या सुमारास अचानक पूर आला. पुलावरून जात असलेले राजेंद्र गोरख पाटील (वय ४०) व निवृत्त सैनिक रवींद्र प्रभाकर पाटील (४५) पाण्यात वाहून गेले.
तसेच अंधार असूनही एक व्यक्ती त्या दोघांना वाचविण्यासाठी पुढे आला मात्र त्यालाही परिस्थिती धोकेदायक वाटल्याने त्याने त्यांची साथ सोडली. नदीचा पूर दुपारी बारा दरम्यान काहीसा ओसरला. तेव्हा महादेव मंदिरासमोरील पुलाच्या खाली दोघांनी एकमेकांची बोटे घट्ट पकडलेल्या अवस्थेत सापडले.
दरम्यान ग्रामस्थांनी ही बाब पोलिसांना कळविली. पोलिसांनी त्या दोघांचे मृतदेह वर काढून पंचनामा केला व विच्छेदनासाठी पाचोऱ्याला मृतदेह पाठविले. त्या दोघांच्या मृत्यूने नगरदेवळ्यावर शोककळा पसरली.