मोरगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क

रावेर येथून तामसवाडी मार्गे मोरगाव, खिरवड, नेहते व दोघे तसेच अटवाडे या गावांना जातांना मध्य रेल्वेची रेल्वे लाईन ओलांडून जावे लागते. या ठिकाणी पूर्वी पासून एक रेल्वे गेट अस्तित्वात होते. काही महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने त्या ठिकाणी रेल्वे गेट बंद करून त्या ठिकाणी प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी व मोठ्या अवजड वाहनांना सुद्धा येण्या-जाण्यासाठी भुयारी मार्ग काढलेला आहे. परंतु हा भुयारी मार्ग वाहनधारकांच्या जिव्हारी लागलेला आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी नेहमी साचत असते पावसाळा असो वा नसो अवकाळी पाऊस जरी झाला तरीसुद्धा या ठिकाणावरून मोटर सायकल तसेच इतर वाहने चालवणे कठीण होऊन जाते.
याआधी सुद्धा रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दैनिक लोकशाही मधून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाने त्यावर अजून तोडगा काढलेला नाही या ठिकाणावरून रात्री अपरात्री जाताना प्रवाशांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागते. तरी कृपया रेल्वे प्रशासनास विनंती आहे की त्यांनी या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा. व प्रवाशांना भयमुक्त करावे. असा सूर सुज्ञ नागरिकांमधून निघत आहे. तसेच झालेल्या कामाबद्दल रेल्वे अभियंता यांच्या कार्यक्षमतेवर जाणारे येणारे प्रवासी आपापली मतं मांडताना दिसत आहेत. याला कारणही तसेच आहे रेल्वे म्हटले म्हणजे काम आणि कामाची क्वालिटी यात कुठलीही शंका नाही. परंतु या ठिकाणी असे काय आहे की ते अजून मार्गी लागण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे. कृपया लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची समस्या दूर करावी.

