लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात अद्यापही नागरिक मान्सूनच्या प्रतीक्षेत असताना हवामान खात्याने दिलासादायक माहिती दिली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, प्रशांत महासागरात अल निनो दाखल झाला असून त्याचा प्रभाव मान्सूनवर पडतं आहे. तसेच कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनची प्रगती मंदावली असून कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्यावर मान्सून मुंबईसह राज्यभरात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. IMD च्या ताज्या अंदाजानुसार पाऊस २० जून पर्यंत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. दरम्यान नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या वाटचालीकडे लागले आहे.
हवामान विभागाने यापूर्वी १५ ते १६ जूनदरम्यान मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, अशी शक्यता वर्तवली होती. मात्र, वाऱ्यांची परिस्थिती अनुकूल नसल्याने मान्सूनची प्रगती अपेक्षेपेक्षा संथ झाली आहे. त्यामुळे अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा कायम असून शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार, मुंबईसह महाराष्ट्रभर मान्सून २० जून पर्यंत दाखल होणार असल्याची माहिती आहे.
यंदा राज्यात सरासरीच्या सुमारे ९० टक्के पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने यापूर्वी व्यक्त केली आहे. कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. पावसाची सातत्यपूर्ण सुरुवात झाल्यानंतरच पेरणी करणे अधिक सुरक्षित ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
देशाच्या पूर्व भागात मात्र मान्सूनने प्रगती सुरू ठेवली आहे. शुक्रवारी नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पश्चिम बंगाल आणि बिहारच्या आणखी काही भागात प्रवेश केला. तसेच ओडिशा आणि झारखंडमध्येही मान्सून दाखल झाला आहे. मात्र, शनिवारी मान्सूनच्या प्रगतीत विशेष बदल झाला नाही. अरबी समुद्रातील परिस्थिती स्थिर राहिल्याने महाराष्ट्रातील पुढील वाटचाल काहीशी संथ झाली आहे. आता राज्यातील नागरिक, शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष मान्सूनच्या पुढील हालचालींकडे लागले असून, येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे. २० जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाल्यास खरीप हंगामाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.


