पश्चिम रेल्वे मार्गावर नवीन प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करा

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

पश्चिम रेल्वे मार्गावर नवीन प्रवासी गाड्यांसाठी आमदार अनिल पाटील सुरवातीपासून आग्रही असताना यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी त्यांनी दिल्ली येथे रेल्वेचे केंद्रिय राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन नवीन प्रवासी रेल्वे गाड्या सुरु करा आणि अमळनेर स्थानकावर थांबा गाड्यांना थांबा द्या या मागणीचे निवेदन दिले आहे.

सदर निवेदनात आमदारांनी पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सुविधेसाठी 19003/19004 खान्देश एक्सप्रेस ही भुसावळ जंक्शन ते बांद्रा टर्मिनस अशी सुरु आहे. खान्देश एक्सप्रेस ही आठवडयातुन तीन दिवस बांद्रा टर्मिनसपर्यंत धावते प्रवाशांच्या सोईच्या दृष्टीने खान्देश एक्सप्रेसचा शेवटचा थांबा बांद्रा टर्मिनसऐवजी मुंबई सेंट्रल करण्यात येऊन खान्देश एक्सप्रेसला नियमित दैनंदिन सुरु करण्यात यावी. तसेच नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, अमळनेर, धरणगांवसह खान्देशातील बहुसंख्य लोकं उद्योग व शिक्षणासाठी दिल्ली व पुणे येथे आहेत.

तरी खान्देशातील प्रवाशांच्या सोईच्यादृष्टीने सुरत जंक्शन उघना-नंदुरबार अमळनेर-जळगांव-मनमाड-दौंड-पुणे व भुसावळ जंक्शन पासून जळगांव- अमळनेर- नंदुरबार सुरत- नवी दिल्ली अशा दोन नवीन प्रवासी रेल्वे गाडया नियमित दैनंदिन सुरु करण्यात याव्यात अशी मुख्य मागणी त्यांनी केली. तसेच अमळनेर येथील प्रवाशांच्या मागणी नुसार २२९१३/२२९१४ हमसफर एक्सप्रेस बांद्रा टर्मिनस ते सहरसा जंक्शन दरम्यान धावते, हमसफर एक्सप्रेसचा अमळनेर येथील थांबा काढण्यात आला आहे.

तरी २२९१३/२२९१४ हमसफर एक्सप्रेसला अमळनेर येथे थांबा देण्यात यावा अशी विनंती आमदार अनिल पाटील यांनी यात केली आहे. दरम्यान सदर मागण्यांसंदर्भात मंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाल्याने मंत्र्यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याआधी देखील आमदारांनी पाठपुरावा करून रेल्वे बाबत विविध प्रश्न मार्गी लावले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.