लोकशाही न्यूज नेटवर्क
मध्य प्रदेशच्या भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका बाबाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे काँग्रेस सरकारच्या काळात या बाबाला राज्यमंत्री पदाचीही जबाबदारी देण्यात आलेली होती. याच बाबाला आता बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानं सगळ्यांनाच धक्का बसलाय.
Madhya Pradesh | Baba Vairagyanand Giri, also known as Mirchi Baba arrested on rape charges
Case registered under section 376 of IPC. The accused has been arrested. Further investigation into the matter is underway: Nidhi Saxena, ACP, Bhopal pic.twitter.com/xwY2Q1KuRC
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) August 9, 2022
भोपाळमधील (Bhopal) एका महिलेनं मध्यप्रदेशातील मिर्ची बाबा याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली होती. पीडितेनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे अखेर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत मिर्ची बाबावर (Mirchi Baba) अटकेची कारवाई केलीय.
मूल होत नाही म्हणून ही महिला आपली अडचण घेऊन वैराग्यानंद गिरी यांना भेटली होती. वैराग्यनंद उर्फ मिर्ची बाबा यांनी या महिलेला आपल्या जवळ बोलवलं होतं आणि प्रसाद म्हणून दिलेल्या एका भस्मातून महिलेला बेशुद्ध केलं, असा आरोप करण्यात आलाय. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या महिलेवर नंतर बाबाने संतापजनक कृत्य केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलीय. मिर्ची बाबावर कलम 376, 506 आणि 342 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
महिलेला जीवे मारण्याची धमकी
महिलेनं दिलेल्या तक्रारीमध्ये या मिर्ची बाबाच्या गैरकृत्याला विरोध केला होता, असं म्हटलंय. तेव्हा वैराग्यनंद गिरी उर्फ मिर्ची बाबाने या महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने वैराग्यनंद यांच्या भीतीने आणि समाजात बदनामी होईल या दबावाखाली पोलिसात तक्रार दाखल केलेली नव्हती. सोमवारी पीडित महिलेनं अखेर हिंमत करुन पोलीस स्थानक गाठलं आणि घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एफआयआर दाखल केला. त्यानंतर पोलिसांचं पथकं मिर्ची बाबावर कारवाई करण्यासाठी ग्लालिअरला रवाना झाली होती.
बाबा जेरबंद
ग्वालिअर पोलिसांच्या मदतीने मध्य प्रदेश पोलिसांनी अखेर मिर्ची बाबावर अटकेची कारवाई केली. याबाबत आधी ग्वालिअर पोलिसांना मध्य प्रदेशच्या भोपाळ पोलिसांनी कल्पनाही दिली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या महिला पथकाकडून आणि क्राईम ब्रांच यांच्या संयुक्त कारवाईदरम्यान, मिर्ची बाबाला ताब्यात घेण्यात आलं.
अनेक महिलांसोबत गैरकृत्य
आता मिर्ची बाबाला कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली जाणार असून अशाप्रकारे इतरही महिलांसोबत मिर्ची बाबाने गैरकृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्या अनुशंगाने आता नेमकी काय माहिती चौकशीतून समोर येते, हे पाहणं महत्त्वाचंय. भारतात याआधीहीह भोंदू बाबांच्या आमीषाला बळी पडून महिलांसोबत गैरप्रकार घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
मिर्ची बाबा कसा आला चर्चेत ?
मिर्ची बाबा 2019 लोकसभा निवडणुकीत चर्चेत आला होता. मिर्ची बाबाने भोपाळ मधून कॉंग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्यासाठी 5 क्विंटल मिर्ची जाळून यज्ञ केला. दिग्विजय सिंहांचा विजय न झाल्यास दुसऱ्या दिवशी जलसमाधी घेईल. मात्र भाजपच्या प्रज्ञा सिंह या दिग्विजय सिंहांपेक्षा 3.5 लाख अधिकचे मते घेऊन निवडून आल्या. यानंतर बाबा जलसमाधी कधी घेणार ? असा सवाल विचारला जाऊ लागला. त्यानंतर मिर्ची बाबा गायब झाला होता.