लोकशाही न्यूज नेटवर्क
राजस्थानमधील भिवाडी येथील एका केमिकल फॅक्ट्रीमध्ये लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा जिवंत जळून मृत्यू झाल्याची ङटना समोर आली आहे. केमिकल फॅक्ट्रीमध्ये एकापाठोपाठ एक अनेक स्फोट झाल्यामुळे आग लागली होती. ही आग पसरत संपूर्ण फॅक्ट्रीमध्ये लागली. यामध्ये ८ कामगारांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे समजतेय. तर काहीजण जखमी आहेत. फॅक्ट्रीतील आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे. आगडोंब पाहता मृताची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे.
भिवाडीमधील खुशखेडा करौली औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक जी १/११८ बी येथे आज सकाळी भीषण आग लागली अचानक स्फोट झाल्यामुळे आग लागलयाची माहिती समोर आली. आगीची माहिती मिळताच अनेक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, आग काही मिनिटांतच भडकली. कारखान्यात रसायने आणि ज्वलनशील पदार्थ असल्याने आग अतिशय वेगाने पसरली. प्राथमिक अहवालानुसार या अपघातात आठ कामगारांचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे. बचाव कार्यादरम्यान आतापर्यंत ८ कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही दुर्घटना घडली त्यावेळी कारखान्यात २५ ते ३० जण कामगार होते. त्यामधील काहीजण सुरक्षित बाहेर पडले. पण स्फोटामुळे काहीजणांना बाहेर पडताच आले नाही. त्यांचा जळून मृत्यू झालाय. अग्निशमन दल आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे. अग्नितांडव पाहाता मृताचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भिवाडी, खुशखेडा आणि आसपासच्या परिसरातील सर्वच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कामाला लागले. आग अद्याप आटोक्यात आलेली नाही, पण काही प्रमाणात कमी झालेली आहे. स्थानिक प्रशासनाने कारखान्याच्या सुरक्षा व्यवस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्या काराणामुळे आग लागली? याचा तपास केला जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

