स्टॅम्पवर लिहून देण्यास सांगितल्याचा राग आल्याने महिलेला मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) – भागीदारीत घेतलेल्या कार्यालयाच्या कागदपत्रांवरून निर्माण झालेल्या वादातून महिलेला मारहाण केल्याची घटना नशिराबाद परिसरात घडली. या प्रकरणी सहा जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपाली चाळू सुरवाडे (वय ३३, रा. मन्यारखेडा शिवार) यांनी कार्यालयाचे कागदपत्र हवे असल्यास स्टॅम्पवर लिहून द्या, असे सांगितल्यावर रागाच्या भरात पांडुरंग ठाकरे, दगडू गवळे, रवींद्र दगडू गवळे, मनिषा दिनेश गवळे, शांताबाई दगडू गवळे, पूजा रवींद्र गवळे (सर्व रा. मेहरुण) यांनी दि. १३ एप्रिल रोजी त्यांच्या घरी येऊन वाद घातला. त्यात दीपाली यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली.
मारहाणीदरम्यान मनिषा गवळे यांनी दीपाली यांच्या बोटाला चावा घेत जखमी केले, तसेच त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेनंतर दीपाली सुरवाडे यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सहा जणांविरोधात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.