राज्यावर पुन्हा अस्मानी संकट; ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात प्रचंड उन्हाचा चटका जाणवत आहे. मार्चच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी किमान आणि कमाल तापमानात विक्रमी वाढ (Temperature in maharashtra) झाली आहे. काल मुंबईत देखील तापमानात प्रचंड वाढ झाली होती. येथील पारा 37.1 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर आजही राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम आहे.

मात्र विकेंडनंतर दोन दिवस कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता (Rainfall) आहे. विकेंडनंतर पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात (IMD alerts) आली आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, सोमवारी 07 मार्च रोजी पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे. तसेच याचदिवशी नाशिकसह (Nashik), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar) आणि जळगाव (Jalgaon) या ठिकाणी विजांचा गडगडाट होणार आहे.

त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अथवा लांबचा प्रवासा टाळावा, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मंगळवारी (8 मार्च) राज्यात पावसाची व्याप्ती आणखी वाढणार असून कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, परभणी आणि हिंगोली या दहा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

दरम्यान पुण्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला हवेच्या दाबाचं क्षेत्र मागील 06 तासांत 15 किमी प्रतितास वेगानं उत्तर-वायव्य दिशेनं सरकला आहे. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. याचाच परिणाम म्हणून आज तामिळनाडूचा किनारी प्रदेश, पुड्डुचेरी, कराईकल, दक्षिण आंध्र प्रदेश आणि रायसीमा परिसरात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.