मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात पुढील ५ दिवस विचित्र तापमान अनुभवायला मिळणार आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील पाच दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
आज मुंबईमध्ये ढगाळ वातावरण जाणवेल तसेच येत्या पाच दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रा लगतच्या मराठवाड्याच्या भागांत वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्हा आणि रायगड येथील भागामध्ये सोमवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे पाऊस पडू शकतो. सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सोमवार ते गुरुवार या दरम्यान पाऊस पडू शकतो.
तर कोल्हापूरमध्ये बुधवारपर्यंत, नांदेडमध्ये बुधवार आणि गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच बीड-परभणीमध्ये गुरुवारी पाऊस पडू शकतो. या काळात वाऱ्यांचा वेग जास्त असू शकतो.
अकोला आणि बुलडाणा येथे मंगळवारी ते गुरूवारी या काळात उष्णतेच्या लाटेचा तडाखा जाणवू शकतो. तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये बुधवारी आणि गुरुवारी उष्णता वाढू शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.