मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे काल आदेश काढण्यात आले होते. पण, याबाबतचे पत्रक काढून 12 तास उलटत नाही तोच 5 अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे मुंबई आणि ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. एक परिपत्रक काढून राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत राज्याच्या गृह विभागाकडून माहिती देण्यात आली होती. हे परिपत्रक काल म्हणजेच बुधवारी जारी करण्यात आले होते.
पण, या अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला अवघ्या 12 तासांतच स्थगिती देण्यात आली. मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह पाच आयपीएस अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली होती.
अप्पर पोलीस आयुक्तपदी महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे या अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली होती. गृहविभागाने याच आदेशाला स्थगिती दिल्यामुळे पोलिसांच्या बदल्यांमधील गृहविभागाचा अजब कारभार समोर आला आहे. सध्या सर्वत्र गृहविभागाच्या या कारभाराची चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान स्थगितीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.