
लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात काहीसा बदल जाणवत आहे. उष्णतेची तीव्रता कायम असली तरी अनेक भागांत वादळी वारे वाहताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरीही पडत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील एक ते दोन दिवस राज्यात अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारताच्या दक्षिणेकडील समुद्र परिसरात ढगांची दाटी वाढत असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत. 10 मे रोजी उपग्रहाने टिपलेल्या दृश्यांमध्ये भारताच्या पूर्व किनाऱ्यालगत, विशेषतः बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात ढग जमा झाल्याचे दिसून आले आहे. भारतीय हवामान विभागानुसार पुढील 48 तासांत या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते.
काही हवामान मॉडेल्सनी या प्रणालीचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार या प्रणालीतून चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता सध्या मध्यम ते कमी असल्याचे सांगितले जात आहे. तरीही ही प्रणाली काही दिवस सक्रिय राहू शकते.
या वातावरणीय घडामोडींचा परिणाम देशाच्या दोन्ही किनारपट्ट्यांवर जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः 14 मेनंतर कोकण किनारपट्टीसह काही भागांत पावसाची शक्यता बीएफएस मॉडेलमधून व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनपूर्व काळात हिंदी महासागराच्या उत्तर भागात अशा कमी दाबाच्या प्रणाली आणि चक्रीवादळांची निर्मिती होत असते. याच प्रक्रियेमुळे मान्सूनला गती मिळण्यास मदत होते. त्यामुळे हवामान तज्ज्ञांचे या प्रणालींकडे बारकाईने लक्ष आहे.
दरम्यान, देशाच्या मुख्य भूमीचे वाढते तापमानही मान्सूनच्या हालचालींवर प्रभाव टाकत आहे. महाराष्ट्रात सध्या बहुतांश ठिकाणी तापमान 38 ते 42 अंश सेल्सियसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. मात्र 13 ते 18 मे दरम्यान विशेषतः विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता असून तापमान 45 ते 47 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

