
लोकशाही विशेष लेख
“राम कृष्ण हरी विठ्ठल”
हे शब्द ऐकताच आठवण होते पंढरीच्या वारीची… काय तो सोहळा आणि काय त्याची किमया.. त्या वारीच्या प्रत्येक स्पर्शाने पंढरीत अगदी स्वर्ग सोहळा निर्माण होतो. ज्याप्रमाणे आईला तिच्या लेकराची ओढ असते, शिष्याला त्याच्या गुरुची ओढ असते, तसेच वारकऱ्यांना पांडुरंगाची माझ्या विठ्ठलाची ओढ असते. मग यंदा तरी ही वारी अनुभवता येतेय का ? याच प्रश्नाने मन गुंतत चाललेय. मग या प्रश्नाच्या उत्तरासाठी सुरू झालेली मनात पांडुरंगाला भेटायची ओढ. पांडुरंग जो सखा, हरी, विठ्ठल, पाठीराखा या असंख्य नावांनी मनात स्थान करून आहे. या वारीची गंमतच निराळी जेव्हा आषाढातल्या ढगांची सावली आकाशात सावळ्या रंगाने चाहूल देते तेव्हा सुरू होते माझ्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ. पांडुरंग म्हणजे अंतरात्मा आहे.. जो प्रत्येक वारकऱ्याच्या अभंगात आहे.. जो हातात असलेल्या टाळ मृदंगात आहे… जो तुळशीच्या पानापानात आहे.. माझा पांडुरंग त्या वारीच्या प्रत्येक वारकऱ्यात आहे. जो पावसाच्या अलगद थेंबात आहे. जो हसणाऱ्या त्या चिमुकल्या रूपात आहे. काय वर्णन करावं तुझं विठ्ठला या वारीच्या प्रत्येक माणसात तू आहेस. पण यंदा तरी तुझी ही वारी घडतेय का? याच विचाराने मन अस्वस्थ झालयं रे पांडुरंगा तू तर ठाई ठाई आहेस रे तरीही तुझ्या भेटीची ओढ मनात आहे. या भेटीसाठी मन आतुर झाले. पण तरीही तुझी किमया अशी आहे की या पावसाच्या सरीत सुद्धा तुझ्या दर्शनाची ओढ दिसते. विठ्ठला तुझा महिमा अगाध आहे.
“पाऊले चालती पंढरीची वाट”
हे शब्द जेवढे निर्मळ आहेत. त्याहून सुंदर तुझ्या वारीची रचना जी मनाला एवढी भावते की साक्षात प्रत्येक माणसात त्या वारीत देवाचे रूप दिसते. जेव्हा घन दाटून येतात तेव्हा मन भरून येते. जेव्हा पाऊले तुझ्या दर्शनासाठी चालतात तेव्हा हृदय दाटून येते. विठ्ठला भक्तीसाठीची ही तुझी महिमा अगदी मनाला भावणारी आहे, पण भक्तासाठी युगे अठ्ठावीस उभा राहून ही कधी तक्रार नसणारा तू माझा पांडुरंग आहेस.
“रंगुनी रंगात साऱ्या विठ्ठला रंग तुझा वेगळा”
वारीचा हा सोहळा जणू तूच माझा पाठीराखा. अशा या वारीत प्रत्येक वारकऱ्याच मन तल्लीन होऊन जातं. तसेच असे खूप प्रसंग वारीत घडतात की ज्याने माणसाच्या आयुष्याला नवी दिशा मिळते विठ्ठला. तसाच एक अनुभव माझ्या आयुष्यात आहे विठ्ठला तुझी वारी घडणे ही देखील तुझी इच्छा पण मनातील भावना ओळखून ती पूर्ण करणे हे तुझ्याच हाती विठ्ठला माझे आजोबा देखील पंढरीची वारी कधीही न चुकवता करायचे तसं मला त्यांच्या सोबत ते अनुभवण्याचा प्रसंग नाही आला पण त्यांच्याबद्दल ऐकलेल्या अनुभवाणे मला वारीचं दर्शन झालं मनामध्ये असलेली एवढी निष्ठा ही माझ्या मनाला खरचं भावली तेव्हापासून मला ओढ आहे ती पांडुरंगा तुझ्या भेटीची.. तुझ्या दर्शनाची.
वारी आली की मनात तुझ्या अभंगाचे गीत सुरू होते.. पावलोपावली चालताना तुझ्या वारीची सुंदरता दिसते.. “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” हे ऐकताच भक्त पुंडलिकाची भक्ती डोळ्यासमोर येते. आणि मग मनात सुरू होते “अवघाची रंग एक झाला” या शब्दाच्या अर्थाची प्रेरणा. प्रत्येक परिस्थितीत सर्वांच्या सोबती असणाऱ्या माझ्या पांडुरंगाचा रंग ही एकच.. या भावनेची अतूटता. विठुराया तुझी भेट ही मनाला सुखद आनंद देणारी. आणि त्यामुळे मनाला लागलेली तुझ्या भेटीची ओढ तुझ्या गोड अभंगाने मनात रुजून गेलीय.
“दिव्य सोहळा पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला”
हे शब्द जेव्हा कानी येतात तेव्हा या क्षणासाठी मन आतुर होतेय बघ. वारीची कथा ही तर प्रत्येकाच्या स्मरणात आहे. भक्ताच्या एका हाकेने तू युगे अठ्ठावीस या विटेवरी उभा राहिलास आणि राजा झालास. या पंढरीचा तेव्हापासून सुरू झालेला हा वारीचा प्रवास पाहून मन दंग होऊन जाते. सर्जा राजाच्या जोडीने संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सुंदर रूप मनाला भावून जाते आणि मग पाऊले चालू लागतात पंढरीच्या वाटेकडे.. या वाटेत प्रत्येक माणूस अनोळखी असतो पण मनाचा मोठेपणा एवढा की प्रत्येक माणूस “माऊली” या हाकेने जवळचा होऊन जातो. केवढी ही गंमत हजारो पगड जातीतले वारकरी असतात. पण कधी तक्रार नाही. फक्त मुखी “राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी !” हे वर्णन ऐकून जेवढं समाधान मिळतं तेवढी ओढ वाढते ती पांडुरंगाच्या भेटीची.. यंदा तरी ही वारी फक्त अनुभवाने घडली विठ्ठला, पण तुझ्या भेटीची वारी अजून मनात तशीच रुजून आहे. म्हणून माझ्या विठुरायासाठी ही कविता जी माझ्या भक्तीची एक ओढ आहे, जी माझ्या पांडुरंगाची एक गाथा आहे..
भक्त पुंडलिकाच्या भक्तीने तू धावून गेला पंढरी
मग युगे अठ्ठावीस सुरू झाली तुझ्या नामाची ही वारी
भक्ताच्या एका शब्दापायी तू युगे अठ्ठावीस उभा
विट ही झाली भाग्यवंत देवा अशी तुझी शोभा
कसली ही तक्रार नाही असा देव माझा भोळा
तुझ्या दर्शना आधी दिली ती पुंडलिकाला जागा
महिमा तुझा थोर देवा तू पंढरीचा राजा
तू दळीले दळण जात्यावरी त्या संत जनाबाईसाठी
पाहून तुझे प्रेम देवा तूच ठाई ठाई
तू सखा पांडुरंग आणि तूच माझी माऊली
भक्तासाठी पाठी उभा बनून तू सावली
तुझी किमया अशी देवा सारे संकट तू तारले
कोरोना सारखी महामारी असतांना तू दुःख सारे सारले
पण घडलं असं देवा की पायी वारी चुकली
आणि विठुरायाच्या गजराने वाहनाने वारी ही निघाली
संकट होत मोठं पण भक्ती कामी आली
तुझ्या आशिर्वादाने ती वारी ही झाली
“राम कृष्ण हरी” म्हटलं की संकट दूर होतं
तुझ्या भेटीसाठी मग मन भरून येतं
नाम तुझे गोड देवा मुखी माऊलीचा गजर
भक्ताच्या एका हाकेने तू नेहमी असतो हजर
चंद्रभागेतिरी देवा आहे तुझी पंढरी
वारी सुरू झाली की आठवते
“राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी”
वारीचा तो सोहळा जणू स्वर्गाचा देखावा
अशी निष्ठा मनी सदैव एकतेचा भाव असावा
लाखो पगड जातीतले वारकरी पण तक्रार कसली नसते
एकजुटीने राहून मुखी “राम कृष्ण हरी” असते
वारीचा हा अनुभव म्हणजे निष्ठा असते मनाची
श्रद्धा आणि विश्वास ही गोष्ट एक पणाची
वारीची ही शिकवण एकच सांगून जाते
सोबती राहुनी सारे दुःख ही मिटते
दुःख मिटले सारे विठ्ठला फक्त ओढ राहिली भेटीची
पुढच्या वर्षी घडूदे ही भेट तुझ्या वारीची
माणुसकी हीच सेवा हा वारीचा उद्देश असतो
पण परमात्मा समजण्यास आजकाल कुणास वेळ नसतो
अनुभव हीच शिकवण जी आयुष्य घडवते
माणसात असतो देव हे वारीचं शिकवते
अशा प्रकारे या वारीचा सोहळा आपण अनुभवला. वारीचा प्रवास ही झाला पण मनी मात्र अजून आहे ती माझ्या पांडुरंगाच्या भेटीची ओढ, जी आयुष्यभर तशीच आहे. वारी माणसाला एकच शिकवून जाते की आयुष्यात कोणतीही कठीण परिस्थिती आली तर तिला एकजुटीने सामोर जायचं असत. खरा पांडुरंग हा माणसाच्या माणुसकीत असतो. आणि हिच माझ्या विठुरायाची शिकवण.
“राम कृष्ण हरी विठ्ठल”!!


