लोकशाही न्यूज नेटवर्क
पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचा क्षण जसा जवळ येतो तसे वारकरी महावैष्णव मनाने कतार होतात आणि भावभक्तीने ओथंबलेल्या स्वराने त्यांची आळवणी सुरु होते.
भेटी लागी जीवा। लागलीसी आस।
पाहे रात्रंदिवस। वाट तुझी॥
भजन, कीर्तन, अखंड हरिनामाचा घोष आदी भक्तिरंगाचे अविष्कार सोबत घेऊन पायीच पंढरपुरास निघालेले वैष्णव आता पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर बनलेले आहेत, त्यांना आता फक्त चरणांवर डोके ठेवण्याची एकाच इच्छेने व्यापले आहे. पायी चालण्याचा शीण कुठल्या कुठे गेला. आता फक्त विठुरायाच्या चरणाची आस.
भाग गेला शीण गेला।
अवघा झाला आनंद।
आता कोठे धावे मन ।
तुझे चरण देखिलिया॥
पंढरीच्या सुखाची तुलना इतर कशाचीच होऊ शकत नाही. एवढे अलौकिक सुख पांडुरंगाच्या दर्शनात आहे. ही वैष्णवांची परमश्रद्धा आणि तीच मनोधारणा कायम ठेवून आज हजारो वर्षांपासून हा अलौकिक सोहळा सुरु आहे. परामभक्तीचे सुख ज्याने भक्त सुखावतो ते हेच या पेक्षा दुजे ते नाही. कोणते कारण या मध्यरे ज्याआतुरतेने भक्त देवास भेटतो तेवढ्याच आतुरतेने देवही भक्तास भेटतो. हे महत्वाचे म्हणून नामदेव महाराज म्हणतात..
वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी।
वास दे पंढरीसी सर्वकाळ॥
वैकुंठाहूनही श्रेष्ठ पंढरपूरचे सुख म्हणून देवाला महाराज विनवणी करतात की, वैकुंठाला ना पाठवता आम्हास पंढरपुरात तुझ्या चरणाजवळच राहू दे देवच वैकुंठ सोडून पंढरीसी आले व कर कटावरी ठेवूनिया उभे राहिले मग वैकुंठास जाण्याचे कारण काय ? कारण चराचर निर्माण होण्याआधीच पंढरपूर होते.
जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर ।
जेव्हा नव्हती काशी गंगा तेव्हा होती चंद्रभागा॥
जसे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा तसे वैकुंठा पेक्षा पंढरपूरचे सुख भक्ताला सुखावणारे आहे. हा अनुपम्य भक्ती सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचे भाग्य लाभणे म्हणजे पूर्वपुण्याईच..
॥जय जय रामकृष्णहरी॥
प्रा. नितीन मटकरी
विष्णू नगर जळगाव
९३२६७७८३२९